भारतात आता 99.1 कोटी मतदार
लोकसभा निवडणुकीवेळी 96.88 कोटी होती संख्या : आयोगाकडून डाटा जारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतात मतदारांची संख्या आता 99.1 कोटी झाली आहे. तर मागील वर्षी लोकसभा निवडणुकीवेळी ही संख्या 96.88 कोटी होती. राष्ट्रीय मतदान दिनाच्या पूर्वी जारी एका वक्तव्यात आयोगाने मतदारयादीत 18-29 वयोगटातील 21.7 कोटी मतदार असल्याचे सांगितले आहे. देशात मतदारांचे लिंग गुणोत्तर प्रमाण 2024 मध्ये 948 वरून वाढत 2025 मध्ये 954 वर पोहोचले आहे. हे प्रमाण महिलांची राजकीय भागीदारी दर्शविणारे आहे.
राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी 25 जानेवारी रोजी निवडणूक आयोग स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. 1950 मध्ये स्थापन आयोगाने भारतीय लोकशाही सशक्त करण्यात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय मतदान दिनाचा उद्देश मतदानाच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि नागरिकांना त्यांच्या अधिकारांबद्दल संवेदनशील करणे आहे.
भारतात मतदारांची ही संख्या देशाच्या लोकशाहीच्या प्रक्रियेत लोकांची वाढती भागीदारी दर्शविणारी आहे. मतदारयादी युवा आणि लैंगिक स्वरुपात संतुलित असून हा एका सुदृढ लोकशाहीवादी समाजाचा संकेत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. भारत आता लवकरच 100 कोटीहून अधिक मतदारांचा देश ठरणार आहे. हा एकप्रकारे विक्रमच ठरणार आहे. तर महिला मतदारांची संख्या जवळपास 48 कोटी होणार आहे.