...तर ही देशातील अखेरची निवडणूक ठरणार!
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा दावा : नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास लोकशाही संपणार
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ही देशातील अखेरची निवडणूक असेल अशी भीती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी व्यक्त केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक लोकांसाठी लोकशाही वाचविण्याची अखेरची संधी असल्याचे उद्गार त्यांनी भुवनेश्वर येथील सभेत बोलताना काढले आहेत.
नरेंद्र मोदींनी आणखी एका निवडणुकीत यश मिळविल्यास देशात हुकुमशाही येणार आहे. लोकांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून दूर राहण्याची गरज आहे, कारण भाजप आणि संघ हे विषासमान असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
ही अखेरची निवडणूक असल्याचे लोकांना सांगू इच्छितो. मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यास देशात निवडणूक होऊ देणार नाहीत, देशात हुकुमशाही येईल. अलिकडेच आमच्यासोबत असलेल्या एका नेत्याला भाजपने स्वत:सोबत नेले. प्रत्येकाला नोटीस बजावणे, घाबरविणे, धमकाविण्याचे प्रकार सुरू आहे. काँग्रेससोबतची मैत्री संपुष्टात न आणल्यास धडा शिकविण्याची धमकी दिली जात असल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.
रशियासारखी होणार स्थिती
याच भीतीपोटी आता अनेक जण काँग्रेससोबतची मैत्री तोडत आहेत. अनेक जण पक्ष सोडत आहेत, तर काही जण आघाडीतून बाहेर पडत आहेत. परंतु इतके भित्रे लोक असले तर हा देश कसा वाचणार? ही घटना कशी वाचणार? लोकशाही कशी वाचणार? याचमुळे ही अखेरची संधी आहे लोकांना मतदान करण्याची. यानंतर कुणीच मतदान करू शकणार नाही कारण रशियात पुतीन यांची ज्याप्रकारे राष्ट्रपतिपदी निवड होते, तशीच भारतात स्थिती होत जाणार असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.
...तर लोकांची मर्जी
राज्यघटनेचे रक्षण करणे, लोकशाहीचे रक्षण करणे, निवडणुका वारंवार व्हाव्यात याकरता सर्वांवर जबाबदारी आहे. लोकांनी निर्धार केला तर लोकशाही वाचू शकते. परंतु लोकांना गुलाम रहायचे असेल तर त्यांची मर्जी असे वक्तव्य खर्गे यांनी पेले आहे.
नितीश कुमारांवर टिप्पणी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे रालोआत परतल्यामुळे निवडणुकीत कुठलाच प्रभाव पडणार नाही. एका व्यक्तीने महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही कमजोर होणार नाही. आम्ही भाजपला पराभूत करू असे खर्गे यांनी म्हटले आहे.