गाव विकासाचा ध्यास घेणाऱ्या जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद
साहित्यिक सुरेश ठाकूर यांचे प्रतिपादन ;त्रिंबक गावच्या अमृत सन्मान सोहळ्यात 155 जणांचा सन्मान
आचरा प्रतिनिधी
गावविकासाचा ध्यास घेऊन विविध विकास कामामधून लोकांमध्ये जागृती निर्माण करणा-या जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. गावातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १५५ जणांचा अमृत सन्मान ही बाब उल्लेखनीय असून लिम्का बुकमध्ये याची नोंद व्हावी असे हे जागृत उन्नती मंडळाचे कार्य असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी त्रिंबक येथे व्यक्त केले. त्रिंबक गाव विकास, सामुहिक शेती, आरोग्य, शैक्षणिक असा विविधांगी विकास उद्देश घेऊन स्थापन करण्यात आलेल्या जागृत उन्नती मंडळ त्रिंबक आयोजित अमृत सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर जागृत उन्नती मंडळ त्रिंबक मुंबई अध्यक्ष दत्ता पवार ,त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, मुंबई समिती कार्याध्यक्ष चेतन साटम, सचिव अरविंद कदम, कोषाध्यक्ष संतोष त्रिंबककर, स्थानिक समितीचे अध्यक्ष यशवंत बागवे, सचिव उदय मेहंदळे, कोषाध्यक्ष श्रीमती पुजा सुतार , मार्गदर्शक सुरेंद्र सकपाळ, त्रिंबक उपसरपंच आशिष बागवे , जनता विद्यामंदिर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर यांसह सुधाकर त्रिंबककर,दिनेश त्रिंबककर,अनिल कदम,श्रीमती दिपा केरकर,योगेश साटम, मंगेश शेट्ये,माजी उपसभापती अशोक बागवे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाडगीळ गुरुजी वाचनालय येथून मंदार सकपाळ यांच्या ढोलपथकाच्या सहाय्याने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत त्रिंबक ग्रामस्थ उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. अमृत सन्मान सोहळ्यास मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने सुरुवात झाली यानंतर प्रतिनिधीक स्वरूपात त्रिंबक गावातील जेष्ठ नागरिक यांचा, ,बाळंतपण काढणा-या सुईनी सुजाता कदम यांचा कृतज्ञता सन्मान,कोरोना काळात काम केलेले त्रिंबक गावचे डॉ. सिद्धेश सकपाळ, पोलीस पाटील सिताराम सकपाळ, आशा स्वयंसेवीका छाया साटम, गावठी वैद्य आप्पा भाट माजी उपसभापती अशोक बागवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला. तर उर्वरित ग्रामस्थांचा अमृत सन्मान अनोख्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या हस्ते एकाच वेळी सभागृहात करण्यात आला .या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना गाव विकासासाठी सर्वानी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष दत्ता पवार यांनी गावाची जलवाहीनी सफाई, वृक्षारोपण यांसारख्या कामामधून लोक गाव विकासासाठी एकत्र येत असतील तर त्यांचे हात बळकट केले पाहिजेत या भावनेतून आम्ही त्रिंबककर एकत्र आलोत. यातूनच त्रिंबक गाव प्रगतशील बनविण्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याचे मत व्यक्त केले.या सोहळ्यानंतर सायंकाळी स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चंद्रकांत साटम मुंबई यांचा शिवदर्शन हा कार्यक्रम संपन्न झाला यालाही त्रिंबक वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.