योग्यांनी त्यांच्या चित्ताला स्वत:च्या स्वाधीन करून घेतलेले असते
अध्याय पाचवा
भगवंत सांगतात की, सात्विकता, स्थिरता आणि सौख्य ह्या गोष्टी बाहेरून मिळवण्याच्या नसून त्या, आपल्या अंतरातच आहेत हे ओळखलेला योगी आत्मस्वरुपात विरघळून जाऊन स्वत:च आत्मस्वरूप झालेला असल्याने यालोकीच मुक्ती मिळवतो. योगी आत्मसुखाशी एकरूप होऊन ते कायम भोगत असतो. या सांगण्याबोलण्याच्या गोष्टी नसून ज्याच्या त्याने अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. परब्रह्मसुखाचे स्वरूप कधी शब्दात मांडता येत नाही म्हणून जे ब्रह्मनिष्ठ आहेत ते मात्र हे मर्म सहज जाणतात. परब्रह्मसुखाचे वर्णन शब्दात करता येत नसले तरी ते अनुभवणारे योगी त्यात मस्त अथवा धुंद झालेले असल्याने ते ब्रह्मैक्य भावाचे मूर्तिमंत पुतळेच असतात. ते शुद्ध सात्विक असून चैतन्यरूप असतात. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान असल्याने ते ब्रह्मविद्येचे सगुण रूप असतात. अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचलेले असल्याने त्या ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झालेले असतात.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, आत्मसुखाचा आनंद घेण्यासाठी मनात कोणत्याही शंका नसाव्यात, मन ताब्यात हवे, सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटायला हवे, त्यांच्या हिताची कळकळ लागून त्यादिशेने कार्य चालू असायलाहवे.
फिटले दोष शंका हि मुठीत धरिले मन। पावले ब्रम्ह-निर्वाण ज्ञानी विश्व-हिती रत ।।25 ।।
आत्मसुखाचा आनंद घेणाऱ्यांना मोक्ष मिळतो. हे आत्मसुख आपल्या अंतरात जरी असले तरी त्याचा शोध लागण्यासाठी योग्याची पूर्वीची पापे नष्ट व्हायला हवीत, मनात कोणत्याही शंका नसाव्यात, मन ताब्यात हवे, सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटायला हवे, त्यांच्या हिताची कळकळ लागून त्यादिशेने कार्य चालू असायला हवे. मोक्ष मिळण्यासाठी काय काय आवश्यक आहे हे पाहिल्यावर हे सर्व आपल्याला कधी साध्य होणार असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे सहाजिक आहे. पण त्यासाठी प्रयत्न करायचा हे एकदा ठरले की, तेथूनच मन प्रसन्न होते आणि हा लांबलचक प्रवास आनंदाने सुरु होतो. या प्रवासाचे उद्दिष्ट जरी आत्मसुखाची प्राप्ती हे असले तरी ते प्राप्त होईपर्यंतचा प्रवास हाही आनंददायक असल्याने योग्याला ते मिळण्यासाठी किती कालावधी लागेल याची फिकीर नसते. माउली
म्हणतात, आत्मसुख प्राप्त झाल्याची जाणीव झालेल्या योग्याला आपणच शुद्ध आत्मज्ञान आहोत आणि आपल्याच देहामध्ये परब्रह्म आहे हे लक्षात येते. संपूर्ण निरिच्छ आणि नि:शंक झालेले अतिशय श्रेष्ठ योगी आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याचे अधिकारी असतात. ते थोर ऋषींच्याकरताच राखून ठेवलेले असते किंवा वैराग्यावानांच्या वाट्याला आलेले असते.
काम-क्रोधास जिंकूनि यत्ने चित्तास बांधिती । देखती ब्रम्ह-निर्वाण आत्म-ज्ञानी चहूंकडे ।। 26 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, सर्वसामान्य माणसाचे चित्त विषयांच्या उपभोगासाठी वेडे झालेले असते त्याउलट योग्यांनी त्यांच्या चित्ताला विषयांच्या तावडीतून सोडवून त्यांच्या स्वाधीन करून घेतलेले असते.
क्रमश: