वाघबीळ ते शाहूवाडी रस्ता मृत्यूचा सापळा
कोल्हापूर :
कोल्हापूर शहराला कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्गावर सद्या खड्डाचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातही घडत आहेत. उन्हात धुळ आणि पावसात चिखल अशी काहीशी परिस्थिती सध्या या रस्त्यावर पहायला मिळत आहे.
सध्या नव्याने करण्यात येत असलेल्या कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील कोल्हापूरपासुन दहा कीमी अंतरावर गेल्यानंतर वाघबीळ (ता. पन्हाळा) ते आंबा (ता.शाहूवाडी) या 30 ते 35 किलोमीटरच्या पट्टयात रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. यामुळे प्रवास करत असताना वाहनधारक मेटाकुटीला आले आसुन जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्याचा अंदाज येत नाही. त्यात रस्त्यावर चिखल तयार होत असल्याने वाहने घसरण्याचा धोका वाढला आहे. शाहूवाडी तालुका हा दुर्गम
वाड्यावस्त्या असून तेथील एखाद्या रुग्णाला दवाखान्याची गरज लागल्यास रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणेही जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने यातुन रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे देखील कठीण झाले आहे.
वाघबीळ ते मलकापूर हा घाट मार्ग असुन रस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. यावरून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागतेच त्याच बरोबर लहान मोठ्या अपघातांचा ही सामना करावा लागतो. अनेक वाहनधारक खड्डे चुकवण्याच्या प्रयत्न करत असताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात हे नित्याचेच बनले आहेत. या रस्त्यामुळे वाहनधारकांच्या हाडा बरोबर वाहनेही खिळखीळी होत आहेत.
नागरिकांना दवाखान्या बरोबरच वाहन दुरुस्तीचा देखील खर्च वाढला असल्याने, आर्थिक भुर्दंड बसत आहे. या महामार्गाची पाहणी सध्या सुरू आसल्याचे स्थानिक नागरिकां कडून सागण्यात आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याच बरोबर एखादा मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी पाणीही साचुन राहत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती
बरोबरच वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- दुरुस्तीची गरज
सध्या या महामार्गाचे काम सुरु असुन रस्त्याची दुरवस्था बघता किमान तात्पुरती दुरुस्ती करण्याची गरज आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी संततधार पावसात रस्त्यावर पाणी साचुन रहाते. त्यात चालु असलेल्या कामामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
- रुंदीकरणाची गरज
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील मलकापूर, बांबवडे यांसारख्या गावात बायपास काढण्याच्या दृष्टीने सध्या पाहणी सुरू असल्याचे बोलले जात असून मलकापूर शहरात असणाऱ्या अरुंद पुलाच्या रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला असून त्याचे कामही लवकर सुरू होण्याची आशा आहे.
- संरक्षण कठडे हवेत
या रस्त्याचे काम सुरू आहे.काम करत असताना एका बाजुचे काम केल पाहीजे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत.त्यात पाणी साचत आहे. खड्डे भरले पाहीजे.त्याच बरोबर जागोजागी रस्त्यावर जिथे आवश्यक आहे. तिथे संरक्षणासाठी काहीतरी लावले पाहीजे.
-बाबुराव शिंदे, ग्रामस्थ