9 कंपन्यांचे मूल्य 2.15 लाख कोटींनी वाढले
भारती एअरटेलचे मूल्य वाढले सर्वाधिक : टीसीएस एकमात्र नुकसानीत
वृत्तसंस्था नवी दिल्ली
मागच्या आठवड्यात भारतीय शेअरबाजारातील 10 पैकी 9 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 2.15 लाख कोटी रुपये इतकी एकत्रितपणे वाढ झाली असल्याची माहिती आहे. यात सर्वाधिक मूल्य हे दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल यांचे वाढले आहे.
जागतिक बाजारातील सुधारणा व अमेरिका इराण यांच्यात शांतता करार यामुळे शेअरबाजारात मागच्या आठवड्यात चांगली तेजी दिसून आली होती. यामध्ये भारती एअरटेल यांच्या मूल्यात 52,432 कोटींची वाढ होऊन मूल्य 11.63 लाख कोटींवर पोहचले होते. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विमा कंपनी एलआयसी ही राहिली होती. तिचे बाजार भांडवल मूल्य 51,675 कोटींसह वाढत 5.56 लाख कोटींवर पोहचले होते.
यानंतर बजाज फायनान्स, रिलायन्स, लार्सन टुब्रो, एसबीआय, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलीव्हर व आयसीआयसीआय बँकेच्या मूल्यात वाढ झाली होती. फक्त आयटी कंपनी टीसीएसच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र घसरण झालेली दिसून आली.