8 कंपन्यांचे मूल्य 1 लाख 47 हजार कोटींनी वाढले
सेन्सेक्स 1341 अंकांनी वधारला : रिलायन्स, एलआयसी यांचे मूल्य सर्वाधिक वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या 10 पैकी 8 कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये 1 लाख 47 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये एलआयसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी आघाडी घेतली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1341 अंकांनी वधारत बंद झाला होता. सदरच्या आठवड्यात 8 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 1 लाख 47 हजार 935 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 18 मे रोजी शनिवारी शेअर बाजाराचे विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यांच्या भांडवलमूल्यात वाढ
एलआयसीचे बाजार मूल्य मागच्या आठवड्यात 40,163 कोटी रुपयांनी वाढून 6 लाख 16 हजार 212 कोटी रुपयांवर पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 36 हजार 467 कोटी रुपयांनी वाढत 19 लाख 41 हजार 110 कोटी रुपयांवर पोहोचले होते. भारती एअरटेल कंपनीचे बाजार मूल्य 26492 कोटीनी वाढत 7 लाख 64 हजार 917 पोहचले होते. एचडीएफसी बँकेचे बाजार मूल्य 21 हजार 136 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 14 हजार 163 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांचे भांडवल मूल्य घटले
दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे बाजार मूल्य 16588 कोटी रुपयांनी घटत 13 लाख 92 हजार 963 कोटी रुपयांवर घसरले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार मूल्य 6978 कोटी रुपयांनी घसरत 5 लाख 46 हजार 843 कोटी रुपयांवर राहिले होते.