भ्रष्टाचारविरहित हिंदुस्थानची एकता टिकावी!
राज्यपालांचे प्रतिपादन: पणजी क्रांतिदिन सोहळ्यात हुतात्म्यांना आदरांजली : डिसेंबर अखेर पत्रादेवी स्मारकाचे होणार लोकार्पण
पणजी : ‘सुजलाम सुफलाम’ भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला आहे. भारताला सोन्याचा देश म्हटले जायचे. याचे कारण म्हणजे भारताची भूमी आणि भूमीतील प्रत्येक माणूस हा प्रामाणिकपणे आपले जीवन जगत होता. स्वातंत्र्यानंतर भारताला प्रगतीपथावर नेण्यात प्रत्येक भारतीयांचा हात आहे. तरीही भ्रष्टाचारविरहित हिंदुस्थानची एकता टिकायला हवी. गेल्या दहा वर्षांत केंद्रातील सरकारमुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले आहे.अनेकांच्या हौतात्म्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. गोवा राज्य हे देश स्वातंत्र्यानंतर उशिरा मुक्त झाले असले तरी या ठिकाणच्या स्वातंत्र्यविरांनी व लोकांनी दाखवलेल्या धैर्याला तोड नाही, असे गौरवोद्गारही राज्यपालांनी काढले आहेत.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हवेच
राज्यपाल पिल्लई म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही भारतात महात्मा गांधी यांनी एकहाती नेता म्हणून आपले नाव कायम ठेवले. त्यांनी आपल्या घरंदाजीला महत्त्व न देता देशसेवेला प्रथम प्राधान्य दिले. देशाचा कारभार हा भ्रष्टाचारविरहित होण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे भूमिका बजावायला हवी. कारण भ्रष्टाचारी राष्ट्र कधीच सर्वांगीण विकास साधू शकत नाही, असेही राज्यपाल म्हणाले. युवकांनी उत्तुंग कामगिरी करावी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई म्हणाले, डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील जनतेत मिळून मिसळून केलेली जागृती ही क्रांतिची ठिणगी होती. लोहिया यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता क्रांतिची मशाल पेटवली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने गोव्याच्या मुक्तीला सुरूवात झाली. त्यामुळे सध्याच्या युवा पिढीने भौतिक विकासाला महत्त्व न देता सर्व क्षेत्रात उत्तुंग कामगिरीसाठी झटायला हवे, असे देसाई म्हणाले.
गोंयकारपण टिकवण्याची जबाबदारी
गोव्याचा क्रांती दिन साजरा करताना गोंयकारपण टिकायचे असेल तर प्रत्येक गोमंतकीयाने ती जबाबदारी घ्यायला हवी. राज्यात सध्या अमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय वाढत चालला आहे, यावर सरकारने आळा घालण्यास स्वत: पुढाकार घ्यावा. पर्यटनाच्या नावाखाली मूळ गोमंतकीयांच्या जमिनी गोव्याबाहेरील लोकांच्या ताब्यात चालल्या आहेत, तसे होऊ देऊ नये, अशी मागणीही देसाई यांनी सरकारकडे केली.
स्वातंत्र्यसैनिकांना विसरले जाऊच शकत नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोवा मुक्तिसाठी ज्या ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपले योगदान दिले ते विसरले जाऊच शकत नाही. आज देशात विकासाची भरारी घेताना देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षे उशिरा मुक्ती मिळूनही गोवा राज्याने लहान राज्याच्या क्रमवारीत आपला विकास उच्च स्थानावर पोचवलेला आहे. यामध्ये सर्व गोमंतकीयांचे योगदान आहे. राज्याच्या विविध भागात विणलेले रस्त्यांचे जाळे, उड्डाणपूल, साधन-सुविधा निर्माण करण्यात तसेच नोकऱ्यांची उपलब्धी ह्या सर्व गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘डबल इंजिन’ सरकारने आपल्या कार्यकाळात केल्याची माहितीही मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
‘कुंकळ्ळीचा लढा’ दिल्लीत क्रांतिदिन
भारताची राजधानी असलेल्या दिल्ली येथे येत्या 15 जुलै रोजी ‘कुंकळ्ळीचा लढा’ हा क्रांतिदिन म्हणून साजरा करण्यात येईल. गोवा मुक्तीसाठी कुंकळ्ळीवासीयांनी दिलेला लढा हा इतिहासाची साक्ष देतो. हा इतिहास संबंध देशभर जावा तसेच स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांचे कार्य व त्यांच्या योगदानाचा विसर पडू नये, यासाठी दिल्लीत ‘कुंकळ्ळीचा लढा’ क्रांतीदिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
पत्रादेवी स्मारकाचे डिसेंबर अखेर लोकार्पण
देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी गोव्याला मुक्ती मिळावी म्हणून पोर्तुगीजांविऊद्ध लढा दिला. गोव्याच्या सीमेवर ज्या हुतात्म्यांना वीरमरण आले, त्या सर्वांची माहिती व इतिहासाची साक्ष देणारे स्मारक पत्रादेवी येथे पूर्णत्वास येत आहे.या स्मारकावर 32 हुतात्म्यांचा इतिहास दिसून येणार असून त्याचे लोकार्पण येत्या डिसेंबरअखेर करण्यात
कुंकळ्ळीचा इतिहास पाठ्यापुस्तकात
कुंकळ्ळीचा लढा हा गोव्याच्या इतिहासात सुवर्णाअक्षरांनी कोरलेला आहे. या लढ्याचा इतिहास भावी पिढीलाही समजावा, यासाठी इयत्ता नववी व इयत्ता बारावीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यापुस्तकात कुंकळ्ळीच्या लढ्याचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.