महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ममत्व आणि अहंकार या दोन दुर्गुणामुळे विषयांची ओढ लागते

06:05 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, ज्याप्रमाणे उन्हाळा असो वा दुष्काळ, समुद्राच्या पातळीत कोणत्याही परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. त्याप्रमाणे संयमी योग्याचे वर्तन असते. सुखदु:खाच्या प्रसंगी तो कायम स्थिर असतो. मनुष्याने आपापल्या आवडीच्या ठिकाणी वेगाने गमन करणाऱ्या इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून धरावे म्हणजे त्याची बुद्धि स्थिर होते. ह्यावर बाप्पा म्हणतात, इंद्रियांना अशाप्रकारे आवरून धरणे सोपे नाही कारण विषयांकडे ओढ घेणे हा माणसाचा उपजत स्वभाव असतो. पण त्यातले धोके, खाचखळगे लक्षात घेऊन त्यापासून लांब राहण्यातच हित असते. विषयांकडे इंद्रिये धावू लागली की, त्यांना उत्तेजन न देता, समजुतीने वेसण घालण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न करायची सवय एकदा लागली की, हळूहळू स्वभावात बदल होऊन विषयांचं प्रलोभन वाटेनासं होतं.

Advertisement

इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इंद्रिये विषयांकडे धाव घेतात. असं का घडतं हे सध्या आपण पहात असलेल्या श्लोकात बाप्पा सांगतायत, तो श्लोक असा ममताहंकृती त्यक्त्वा सर्वान्कामांश्च यस्त्यजेत् । नित्यं ज्ञानरतो भूत्वा ज्ञानान्मुक्तिं स यास्यति  ।।68।। माणसाला ममत्व आणि अहंकार या दोन दुर्गुणामुळे विषयांची ओढ लागते असं ह्या श्लोकात सांगितलंय. ममत्व म्हणजे अमुक एक माझं आहे आणि ते मला पाहिजे अशी त्या गोष्टीबद्दल ओढ वाटणं आणि अहंकार म्हणजे आपणच काय ते कर्तृत्ववान असा समज होऊन इतरांना तुच्छ लेखणं. आपण स्वत: कर्ते  आहोत अशी माणसाची ठाम समजूत असते. माझ्या देहाच्या बळावर मी काय वाटेल ते करू शकतो असा त्याचा समज असतो पण प्रतिकूल वेळ आली की हा गप्प बसतो. कारण ईश्वर स्वत: कर्ता असून त्याच्या मर्जीनुसार सर्व सृष्टी तो चालवत असतो.

म्हणजेच आपण सर्व कठपुतळ्या असून ईश्वर आपला सूत्रधार आहे. त्याच्या इच्छेनुसार तो आपल्याला नाचवत असतो. या दोन बाबी लक्षात घेतल्या की, ममत्व, आपलेपणाने आलेला स्वार्थ तसेच अहंकार आपोआप गळून पडतो. उदाहरणार्थ आपण कुणाकडे पाहुणे म्हणून गेलो की, तिथल्या वस्तू हाताळताना हजारवेळा विचार करतो कारण त्या आपल्या नसतात. तसेच तिथे वागताना आपण वागतोय ते त्या घरातील लोकांना आवडेल की, नाही असा विचार सतत डोक्यात असतो. ह्याच पद्धतीने आपल्याला जीवनात विचार करायचा आहे. आपली प्रत्येक कृती ईश्वराला पसंत पडण्यासारखी व्हायला हवी. तसे वागताना त्यात आपल्या इच्छेला वाव नाही हे लक्षात आले की, इंद्रिये आपल्या प्रारब्धानुसार मिळालेले भोग आनंदाने स्वीकारतील आणि अधिकचा हव्यास धरणार नाहीत.

हा विचार मनात जसजसा पक्का होत जाईल तसतशा मनातील कामना नष्ट होतील व आहे त्यात समाधानी राहणं असा स्वभाव होऊन जाईल. या स्वभावात स्थिर झालेला मनुष्य स्वत:तल्या ईश्वराला जाणून घेऊ शकेल. स्वार्थ आणि अहंकार सुटणं ही सामान्य गोष्ट नव्हे कारण यामध्ये मी पणाचा नाश होतो. पुढील श्लोकात असा मनुष्य शील व मुक्ती मिळवतो असं बाप्पा ह्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगतायत. एवं ब्रह्मधियं भूप यो विजानाति दैवत ।

तुर्यामवस्थां प्राप्यापि जीवन्मुक्तिं प्रयास्यति ।।69।। अर्थ-हे राजा, याप्रमाणे जो दैवयोगाने ब्रह्मज्ञान जाणतो, तो तुर्यावस्थेला पोचून जीवन्मुक्ति पावतो. या देहामध्येच जिवंत असताना मोक्षाचा अधिकारी होतो. विवरण-ज्या सुदैवी मनुष्याचा मीपणा गेलेला असतो तो दैवयोगाने ब्रह्मज्ञान जाणतो. त्याची अवस्था कशी असते ते पाहू. जेव्हा माणूस ठरवून इतर सर्व गोष्टीतून मन काढून घेतो व मनानं फक्त भगवंतांचा विचार करत असतो तेव्हा त्याची समाधी लागलेली असते. ही अवस्था काही क्षण, काही काळ किंवा काही दिवस टिकू शकते. याला ब्रह्मिभुत किंवा आत्मभुत अवस्था असं म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article