चिनाब ब्रिजवरून धावली रेल्वे
जगातील सर्वात उंच आर्च ब्रिज : 30 जूनपासून रेल्वेचे संचालन
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर निर्माण करण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच आर्च ब्रिजवर गुरुवारी रेल्वे धावली आहे. एका परीक्षणाच्या अंतर्गत रेल्वेने या ब्रिजवरून प्रवास केला आहे. हा ब्रिज संगलदान आणि रियासीदरम्यानच्या रेल्वेमार्गाचा हिस्सा आहे. या मार्गावर 30 जूनपासून रेल्वे संचालित होणार आहे. रेल्वे बोर्ड, उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चिनाब पूलाच्या पाहणीनंतर गुरुवारी एक आठ डबे असलेल्या मेमू रेल्वेचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. रामबन जिल्ह्यातील संगलदान आणि रियासीदरम्यान 46 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या रेल्वेमार्गावर मेमू रेल्वे 40 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावली आहे. या परीक्षणादरम्यान या रेल्वेने 9 भुयारांना ओलांडले आहे.
चिनाब ब्रिज हा पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. आयफेल टॉवरची उंची 330 मीटर आहे. तर 1.3 किलोमीटर लांब या ब्रिजला चिनाब नदीवर 359 मीटरच्या उंचीवर साकारण्यात आले आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत सर्व निर्मितीकार्ये पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच भारतीय रेल्वे काश्मीर खोऱ्याला देशाच्या उर्वरित रेल्वेजाळ्याशी जोडण्याच्या दिशेने आणखी एक टप्पा पूर्ण करणार आहे. 46 किलोमीटर लांबीच्या संगलदान-रियासी मार्गाची 27 आणि 28 जून रोजी रेल्वेसुरक्षा आयुक्त डी.सी. देशवाल पाहणी करणार आहेत. तोपर्यंत उर्वरित कामे पूर्ण केली जाणार आहेत. हा प्रकल्प 1997 पासून सुरू झाला होता आणि याच्या अंतर्गत 272 किलोमीटरचा रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येणार होता. आतापर्यंत विविध टप्प्यांमध्ये 209 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग निर्माण करण्यात आला आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत रियासीला श्री माता वैष्णोदवी कटरा स्थानकाशी जोडणारा 17 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेप्रवास करणे सोपे ठरणार आहे.