भरती ओहोटी...
त्या दिवशी सीमाताई आल्या त्या अगदी काळजीतच..त्यांनी सुरवातीला स्वत:चा सविस्तर परिचय करुन दिला. मॅडम काय करु कळत नाही हो..माझा अगदी नाईलाज झाला आहे असं म्हणत त्या एकदम रडूच लागल्या. सीमाताई शांत व्हा..काय झालं आहे? नीट सांगाल का? हो.
माझी मुलगी मिनल खूप हुशार, सासरीही सगळे हुशार. कशालाही कमतरता नाही पण अलीकडे काहीतरी बिनसलंय. जावई खूप समजून घेतात. तशी भांडणे वगैरे नाहीत पण नेमके काय झाले आहे तेच कळत नाही. हल्ली ती अस्वस्थ असल्यासारखी वाटते. बरं. मला सांगा तिचा दिनक्रम कसा असतो? तशी मिनल पूर्ण व्यस्त असते. म्हणजे आत्ताच नाही तर अगदी पूर्वीपासून सतत ती कशामध्ये तरी गुंतुनच असायची. स्वत:ला खूप व्यस्त ठेवायची. कॉलेजमध्ये तर अनेक मुला मुलींना तिचे उदाहरण दिले जायचे. बरं.
लग्नानंतरही तसंच..सतत कार्यमग्न असते.ठिक आहे. मला तिच्याजवळ बोलता येईल का? हो. तिला पूर्वकल्पना देऊनच मी इथे आले आहे. भेटीची वेळ ठरवून सीमाताई निघून गेल्या. मिनल ठरल्या वेळेनुसार भेटायला आली. बराच वेळ चर्चा झाली. सतत कामामध्ये व्यस्त राहणे, मनाला सतत कशात तरी गुंतवून ठेवणे, सतत सकारात्मक विचारच मनात यायला हवेत हा अट्टाहास आता अस्वस्थतेमध्ये बदलला होता.
आमचा संवाद सुरु असताना मिनलचे लक्ष अचानक बाहेर गेले आणि ती ओरडली, ‘कुणाल..जरा स्वस्थ बसायला काय घेशील? (मिनलचा सहा वर्षांचा मुलगा कुणाल सतत इकडुन तिकडे पळत होता आणि सीमाताईंना दमवत होता.)
मॅडम याची सतत नुसती वळवळ.. जरा स्वस्थ बसत नाही. स्वत:ची आणि दुसऱ्याचीही दमणूक..तिच्या बोलण्याचा हाच धागा पकडत मी म्हटलं म्हणजे मिनल स्वस्थ बसण्याचे महत्त्व माहित आहे तर तुला? हो. मॅडम..सतत धावपळीने शरीर, मन थकत नाही का? मी हसून म्हटले, कुणाल थकणार नाही. मस्ती करायचेच वय आहे त्याचे. पण तुझं खरं आहे. शरीर मनाला विश्रांती हवीच..मला एक सांग ही विश्रांती तु तुझ्या मनाला देते का? काहीही न करता स्वस्थ बसून आपल्या शरीर मनामध्ये काय सुरु आहे हे कधी शांतपणे पाहिले आहे का?
नाही मॅडम.. कधीतरी वाटतं स्वस्थ बसावं पण शरीर
मनाला रिकामं ठेऊन कसे चालेल ना?
ते रिकामं राहीलं तर नकारात्मकता येईल ना? आपण सतत सकारात्मक विचार करायला हवा. सतत पॉझीटीव्ह रहायला हवे ना हो? मला कधीतरी उदास वाटतं मग माझा मलाच राग येतो. मी इतकी स्वत:ला बिझी ठेवते, मोटीव्हेशनल व्हीडीओज पाहते, आनंदी राहते मग असं होतच कसं? अलीकडे याच गोष्टीचा ताण येतो आहे मला..उदास वाटूच कसे शकते ना?
मिनल सोबत बराच वेळ चर्चा झाली. अनेक गोष्टी तिला समजावून सांगाव्या लागल्या. नंतर काही काळ तिच्यासोबत संवाद सुरु होता. काही कालावधीनंतर मनात येणारे विचार साक्षीभावाने पाहणे तिला जमू लागले. काही तंत्राचा अवलंब करत आणि त्यामध्ये सातत्य ठेवत ती या सर्वांमधून बाहेर पडली.
मुळातच एक लक्षात घ्यायला हवे की आपल्या कुणाचीच मनस्थिती सतत आनंदी, उत्साही अशी राहू शकत नाही. निसर्गत: जसा हवामानामध्ये बदल होतो अगदी तसेच आपल्या शरीर, मनामध्ये बदल होणे नैसर्गिक आहे.
पहा हं, आपले ब्लडप्रेशर देखील दिवसभरात निसर्गत: बदलत असते, सकाळपेक्षा दुपारी रक्तावरचा दाब वाढलेला असतो, आपली श्वासाची गती बदलते, पाचक स्त्राव बदलतात. शरीराचे तापमान ठराविक रेंजमध्ये बदलते, रक्तातील साखरेचे प्रमाण बदलते. शरीरात जसे बदल होतात तसेच मनाच्या स्थितीतही होतात. काहीवेळा आपल्याला छान, उत्साही वाटते तर कधी आपल्याला उदास वाटते. काहीवेळा काही बाह्यकारण असते असेही नाही. आपल्या मेंदूतील आणि शरीरातील रसायने सतत बदलत असतात. मेंदूतील सेरेटोनीन हे रसायन चोवीस तासात सतत बदलत असते. भावनाही बदलतात. म्हणजेच मनाची भरती ओहोटी नैसर्गिक आहे. सतत आनंदी राहण्याच्या अट्टाहासापेक्षा मनात येणारे विचार, भावना सजगतेने न्याहाळायला शिकण्याचे तंत्र अवगत करणे आवश्यक आहे. हा सराव करायचा म्हणजे हे सर्व बदल साक्षीभावाने अनुभवायचे. या क्षणी मन उदास आहे तर ठिक आहे ते मान्य करायचे आणि ते किती वेळ असे राहते आहे हे पहायचे. या उदासीनतेचा परिणाम आपल्या कामावर, नात्यांवर होऊ द्यायचा नाही. दहा मिनीटे स्वस्थ बसून स्वत:च्या मनामध्ये डोकावून पाहणे, श्वासाची हालचाल जाणणे, मनात येणारे विचार भावना न्याहाळणे या सरावामुळे हळूहळू मनाकडे साक्षीभावाने पाहणे जमू लागते.
आपण एक लक्षात घ्यायला हवे की कोणताही सुख देणारा अनुभव आपण सतत घेत राहिलो तर तो सुखद रहात नाही. समजा मला गोड पदार्थ आवडतो. मी एक लाडू खाल्ला, दोन खाल्ले, तीन, चार असे करत राहिले तर तो पदार्थ आवडता असूनही चव बदलत जाईल आणि एका क्षणी अक्षरश: नकोसे वाटू लागेल. म्हणजेच आवडता पदार्थ तोच असला तरी तो खाण्याचा माझा अनुभव सुखद रहात नाही. त्यामुळे सुखद अनुभवाच्या क्षणी त्या सुखाचा मनापासून आनंद घ्यावा परंतु सतत तसेच सुख मिळावे हा अट्टाहास मात्र ओझे बनून अस्वस्थ करतो, आनंद घालवतो. सजगता तंत्र अर्थात माईंडफुलनेसच्या सरावामुळे साक्षी होणे जमू लागते.
माझे शरीर आणि मन यांच्याप्रती साक्षीभाव वाढवायचा. शरीरातील संवेदना, मनातील भावना साक्षीभावाने पाहायच्या. अधिक सजग व्हायचे. अर्थात याचा अर्थ कोणती जबाबदारी नाकारायची किंवा आनंदाचा, सुखाचा त्याग करायचा असे नाही. सजग व्हायचे म्हणजे आपली निर्णयक्षमता विकसित करून अधिक चांगला कर्ता व्हायचे आणि रसिकता विकसित करून अधिक चांगला भोक्ता व्हायचे. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे तर ज्यावेळी एखादी गोष्ट, घटना आनंद देणारी आहे त्यावेळी अगदी मनापासून त्याचा आनंद घ्यायचा, जी गोष्ट वा परिस्थिती त्रासदायक आहे त्यावेळी कर्ता होऊन ती बदलण्यासाठी आवश्य प्रयत्न करायचा. परंतु ज्यावेळी एखादी अशी परिस्थिती जी आपल्या आवाक्याबाहेरची आहे त्यावेळी साक्षी होऊन ते पहायचे. यामुळे अगदी कठीण प्रसंगातही त्या गोष्टीचा, प्रसंगाचा, परिस्थितीचा स्विकार करण्याची क्षमता तर वाढते आणि त्या आलेल्या कठीण टप्प्यातून वाटचाल करत असताना मानसिक अनारोग्याच्या दिशेने होणारा प्रवासही टाळता येतो. तसेच मनात येणारे विचार आणि भावना या बाबतची सजगता वाढते. ज्या त्रासदायक भावना आहेत त्यांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी यामध्ये वाढ होत नाही ना याकडेही लक्ष राहते. त्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तसेच लक्ष देण्याचे कौशल्यही विकसीत होण्यासाठी मदत होते. मात्र दररोज दहा मिनीटे शांत बसून असा सराव करायला हवा..चला तर मग...अशा सरावाला सुरुवात करता आहात ना?
अॅड. सुमेधा संजिव देसाई