For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रखरखत्या उन्हातही हिरवाईने नटलेला राजाराम तलाव परिसर

11:35 AM May 09, 2025 IST | Radhika Patil
रखरखत्या उन्हातही हिरवाईने नटलेला राजाराम तलाव परिसर
Advertisement

कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :

Advertisement

ते पर्यावरणादी नाहीत, पण वृक्षाविषयी प्रचंड प्रेम आणि आत्मियता आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी साधने नाहीत. पण टाकाऊतून टिकावू बनवून त्या माध्यमातून झाडांना त्यांनी पाणी घातले. गेल्या सहा वर्षापूर्वी एका व्यक्तीने सुरु केलेल्या या कार्याची सुरुवात आता वसुंधरा ग्रुपमध्ये झाली आहे. यामुळेच शहरापासून काही अंतरावर असलेल्या राजाराम तलावाचा परिसर ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यातही हिरवाईने नटलेला आहे. हिरवाईच्या या दाट झाडीत येथील टेकडी गुडूप झाली आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हातही याठिकाणी क्षणभर विसावल्यास वातानुकूलित गारवा जाणवतो. यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत राजाराम तलाव परिसरात अबालवृध्दांची वर्दळ वाढली आहे. ही कमाल केली आहे वसुंधरा ग्रुपच्या सदस्यांनी.

शहरात महापालिकेच्या बागा आहेत.उन्हाळयात या बागांचा सावलीसाठी आधार होतो. यामुळे सध्याच्या उन्हात दिवसभर बागांमध्ये गर्दी दिसून येते. मात्र उपनगरात बागा नाहीत किंवा उन्हात काही वेळ विश्रांती घेता येईल असे ठिकाण नाही. शहरापासून काही अंतरावर असलेल्या राजाराम तलावाचा परिसर मात्र या कडाक्याच्या उन्हात हिरवाईने बहरला आहे. तलावाच्या पश्चिमेकडील टेकडीवर दाट सावली पसरली आहे. या हिरवाईचे श्रेय जाते ते येथील वसुंधरा ग्रपला. दत्ता पोवार, सुधाकर कुंभार, विजय शिंदे, धनंजय वाडकर, राजू घोगळे, मंगेश मोगणे, प्रमोद पाटील, महावीर कांबळे हे राजाराम तलावा परिसरात दाट वनासाठी काम करत आहेत.

Advertisement

दत्ता पोवार यांच्यापासून येथील वृक्ष लागवड व संवर्धनाचा प्रवास सुरु झाला. सहा वर्षापूर्वी ते तलाव परिसरात फिरायला येत होते. त्यावेळी येथील पश्चिमेकडील टेकडी पूर्ण उजाड होती. पोवार यांनी याठिकाणी रोपटी लावण्यास सुरुवात केली. यासाठी ते कुठल्या नर्सरीत गेले नाहीत. पावसाळयात विविध झाडांच्या बिया पडून कोंब आले होते अशी रोपटे त्यांनी येथील टेकडीवर आणून लागवड करण्यास सुरुवात केली. मात्र उन्हाळयात ही रोपटे जगवण्याचे मोठे आव्हान होते. हार न मानता पोवार प्लास्टिकच्या कॅनमधून पाणी घालत राहिले. पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या त्यांनी झाडांच्या बुंध्यात ठेवून त्यामधून ठिबक सिंचनप्रमाणे पाणी देण्यास सुरुवात केली. त्यांचे हे रोजचे कार्य पाहून सुधाकर कुंभार, विजय शिंदे, धनंजय वाडकर, राजू घोगळे, मंगेश मोगणे,प्रमोद पाटील, महावीर कांबळे पुढे आले.त्या सर्वांनी मिळून वसुंधरा ग्रुप तयार केला आणि या वृक्षलागवड व संवर्धानाच्या कार्याला मोठे बळ मिळाले. यामुळे इकडे झाडांची संख्या वाढत गेली आणि जागा कमी पडली. यामुळे त्यांनी टेकडीच्या आजूबाजूच्या परिसरात लागवड सुरु केली. पाणी घालण्यासाठी त्यांनी मानवी साखळी केली. यामुळे सहा वर्षातील प्रत्येक उन्हाळयात ती झाडे तग धरु शकली. तलावात पोहण्यासाठी आणि याठिकाणी फिरण्यासाठी सर्व प्रकारचे लोक येतात. त्यामध्ये डॉक्टर, उद्योजक, आर्किटेक्ट यांचा समावेश आहे. त्यापैकी एका आर्किटेक्टने झाडांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रथम पॅडल पंप दिला. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने पेट्रोल पंप दिला. तर शिवाजी विद्यापीठाने विद्युत पुरवठयासाठी सहकार्य केल्याने सध्या विद्युत पंपाद्वारे झाडांना पाणी पुरवठा केला जात आहे. याचा परिणाम म्हणून तलावाच्या पश्चिमेकडील मोठा परिसर हिरवाईने फुलला आहे.

  • पाण्याचा कॅन ते विद्युत मोटार

दत्ता पोवार यांनी प्लास्टिकच्या कॅनने झाडांना पाणी घालण्यास सुरुवात केली. झाडाप्रती असलेली त्यांची तळमळ पाहून मदतीचे काही पुढे आले. अनेकांनी रोपे पुरवली तर दात्यांनी पॅडल पंप, पेट्रोल पंप, विद्युत मोटार पुरवली. ज्यामुळे भविष्यात या झाडांचे दाट वनात रुपांतर होणार आहे.

  • रील्स, प्री वेडिंग शूटसाठी गर्दी

पावसाळयात जवळपास चारशे एकराचा परिसर हिरवागर्द होतो. त्यानंतरचे येथील दृश्य आकर्षक असते. यामुळे रील्स बनवण्यासाठी तसेच प्री-वेडिंग शूटिंगसाठी गर्दी होते. शहरापासून काही अंतरावर हे मनमोहक ठिकाण असल्याने तणावमुक्तीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तर प्रेमी युगुलासाठी एकांताचे ठिकाण बनले आहे.

  • दक्षिण आणि पूर्व बाजूलाही झाडांची लागवड

निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून तलावाच्या दक्षिणेला झाडांची लागवड केली आहे. तर पूर्वला आमदार सतेज पाटील यांच्या मदतीने काही लोकांनी दोन हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या एक फूट उंच ही झाडे आली आहेत. त्यांना रोज पाणी घालून संगोपन केले जात आहे. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षात तलावाचा सर्व परिसर दाट गर्द झाडीने नटलेला असेल.

Advertisement
Tags :

.