पावसाचा जोर ओसरला
पणजी : पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत गोव्यात मध्यम तथा जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने यासाठी सहा दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केला आहे. राजधानी पणजीसह गोव्यातील विविध भागात गेल्या 24 तासात बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली. पणजीत सायंकाळी हलक्या प्रमाणात पावसाच्या सरी पडून गेल्या. धारबांदोडा आणि सांगे या भागात प्रत्येकी सुमारे एक इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण बरेच कमी होते. गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी एक सेंटीमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमात आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद आता 120 इंच झालेली आहे. हा पाऊस समाधानकारक आहे. यंदाचा अधिकृत मौसम संपुष्टात येण्यास आता केवळ सहाच दिवस शिल्लक राहिले आहेत. 30 सप्टेंबर हा पावसाळ्याचा अखेरचा दिवस मानला जातो. सध्या गोव्यात अनेक भागात अधून मधून किंचित पावसाचा शिडकावा होतो, मध्येच सूर्यकिरण पडते तर अधूनमधून ढगाळ वातावरण असते. आज 25 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत गोव्यात सर्वत्र मध्यम तथा काही भागात जोरदार पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.