बैठक घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे
मनपा कौन्सिल विभागाने दिली माहिती : जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आल्यानंतरच बैठक
बेळगाव : महापौर यांच्यासह नगरसेवकांनी पावसाळ्यापूर्वी विविध समस्या सोडविण्यासाठी बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. मनपा उपायुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र आचारसंहिता असल्याने याबाबत मनपा निर्णय घेणे अशक्य असून बैठकीबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच बैठक घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली. दोन महिन्यांहून अधिक काळ ही आचारसंहिता आहे. मात्र आता मान्सूनचे आगमन होणार असून शहरामध्ये विविध समस्या भेडसावणार आहेत. त्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. नुकत्याच झालेल्या वळीव पावसाने मोठे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली आहेत तर अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही जणांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. यामुळे जनता तणावाखाली आहे. त्यांची समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. यासाठी बैठक बोलवावी, म्हणून आयुक्तांकडे मागणी करण्यात आली. निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मनपा आयुक्तांना निर्णय घेणे कठीण होत आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील हेच यावर निर्णय घेवू शकतात. त्यामुळे याबाबतच्या माहितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आदेश आला नसल्याचे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले.