भगवान महावीरांच्या तत्त्वांची आज गरज
डॉ. गोडबोले : जिल्हा प्रशासनातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात
बेळगाव : जगाला शांती आणि अहिंसेची तत्त्वे शिकविणारे आणि मानव कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या तत्त्वांचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे, असे उद्गार डॉ. मदन गोडबोले यांनी काढले. श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती बेळगाव आणि जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी श्री भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या महोत्सवाचे उद्घाटन करून ते बोलत होते. आज जगाने महावीरांच्या तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांमध्ये प्रेम आणि विश्वास कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत महावीरांच्या तत्त्वज्ञानाची गरज आहे, असेही ते म्हणाले. कार्याध्यक्ष राजेंद्र जैन यांनी प्रास्ताविक केले. या निमित्ताने रविवारी सकाळी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र चौक येथील मारुती मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ झाला. रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शेरी गल्ली, शनि मंदिर, कपिलेश्वर रोड, शहापूर, गोवावेसमार्गे महावीर भवन येथे सांगता झाली. यावेळी विविध चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी गौरव कार्याध्यक्ष श्रीपाद खेमलापुरे, राजेंद्र जैन, सहकार्याध्यक्ष हिराचंद कलमनी यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जैन युवा संघटनेतर्फे काढलेल्या भव्य बाईक रॅलीमध्ये युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.