उचगाव बसस्थानकावरील खड्डा बनला मृत्युचा सापळा
खड्ड्यांवर तातडीने जाळी बसवण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उचगाव-कोवाड मार्गावरील बसस्थानका शेजारीच पाच फूट खोलीचा व तीन बाय चार फूट लांबी-रुंदीचा गटारीतील खड्डा म्हणजे मृत्युचाच सापळा बनल्याने या खड्ड्यात अकस्मात पडून दुखापत झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. यासाठी तातडीने पीडब्ल्यूडी खात्याने या खड्ड्यांवरती जाळी घालावी, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत आहे. उचगाव बसस्थानकावरती उचगाव-कोवाड मार्गावर उचगाव ग्रा. प.ने प्रवासीवर्गासाठी निवारा शेड, बसस्थानक उभे केले आहे. याच बसस्थानकाच्या खालून व दुतर्फा सार्वजनिक पीडब्ल्यूडीचे पाच फूट खोलीचे आणि तीन फूट रुंदीचे मोठे गटर पाण्याचा निचरा होण्यासाठी काढण्यात आले आहे. बसस्थानकाला लागूनच सदर गटारीवरती जाळी अथवा कोणतेही संरक्षण नसल्याने बसस्थानक आणि गटर समान असल्याने बस आल्याचे पाहत बसमध्ये चढण्याच्या नादात अकस्मात या खड्ड्यात प्रवासी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी या बसस्थानकाशेजारील खड्ड्यांवरती जाळी घालणे अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच या बसस्थानकाशेजारी भाजीपाला विक्रेते, वडापावच्या गाड्या इतर व्यावसायिक या खड्ड्यातच केरकचरा टाकत असल्याने उचगावच्या उत्तरेकडील माळ जमिनीतून येणारा पाण्याचा प्रचंड लोंढा या केरकचऱ्यामुळे अडून पाणी रस्त्यावर साचत असल्याचे अनेकवेळेला चित्र दिसून आले आहे. यासाठी या खड्ड्यांवरती तातडीने जाळी बसवणे गरजेचे आहे. या बसस्थानकात कोवाड भागात जाणारे व बेळगावच्या दिशेने जाणारे अनेक प्रवासी थांबत असतात. याबरोबरच लहान मुले खेळ करत असतात. या सर्वांसाठी हा खड्डा म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने अथवा सबंधित खात्याने तातडीने या खड्ड्यावरती जाळी घालावी आणि नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका टाळावा, अशी मागणी उचगाव ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.