कबुतरे उडालीच नाहीत...
शांततेचे प्रतीक म्हणून कबुतरे उडविण्याची पद्धत आहे. विशेषत: स्वातंत्रदिनी जेव्हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम असतो, तेव्हा अनेक स्थानी अशी कबुतरे उडविली जातात. हे स्वातंत्र्याच्या प्रतीकही मानले जाते. कारण आधी बंधनात ठेवलेली कबुतरे मुक्त केली जातात. पण छत्तीसगड राज्याच्या मुंगेली येथे 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजवंदन केल्यानंतर एक वेगळाच प्रकार पहावयास मिळाला आहे.
या शहरातील मुख्य पोलीस कार्यालयात एसपी असणाऱ्या गिरिजाशंकर जयस्वाल यांनी स्वातंत्र्यदिनी सकाळी तिरंगा ध्वज फडकविला. या कार्यक्रमाला आमदार, माजी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल देवही आले होते. या कार्यक्रमात शांतता आणि स्वातंत्र्य यांचे प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते कबुतरे उडविण्यात आली. उडविण्यात आली याचा अर्थ तसा प्रयत्न करण्यात आला. कारण, हातातून सोडलेली कबुरते उडालीच नाहीत. ती सरळ खाली पडली.
यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सर्वसामान्य नागरीक आश्चर्यचकित झाले. या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रणही करण्यात येत होते. त्यामुळे सोशल मिडियावरही याची चर्चा होत आहे. एसपी जयस्वाल यांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उडविण्यासाठी आधी पकडलेली ही कबुतरे बेशुद्धावस्थेत होती की काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यातही वेगळा प्रकार म्हणजे स्थानिक आमदारांनी याच कार्यक्रमात उडविलेले कबुतर व्यवस्थित उडाले. पण एसपी आणि इतर काही मान्यवरांनी उडविलेली कबुतरे मात्र आकाशात न जाता खाली पडली. असे कसे घडले, यावर बराच खल होत असून या प्रकाराची चौकशी झाल्यास खरा प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. पण तोपर्यंत या प्रकारची चर्चा होत राहणार, हे निश्चित आहे.