विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने अकारण खोटे आरोप
चेअरमन अमृत शेलार : नोकर भरती ही शासनाच्या आणि निबंधक कार्यालयाच्या मार्गसूचीनुसारच
खानापूर : सहकार पॅनेल विरोधात विरोधकांकडे मुद्देच नसल्याने बँकेच्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सुज्ञ मतदार बँकेचे हित लक्षात घेऊन आम्हालाच निवडून देणार यात शंकाच नाही. बँकेचे संपूर्ण व्यवहार पारदर्शक असून नोकर भरती शासनाच्या आणि निबंधक कार्यालयाच्या मार्गसूचीनुसारच करण्यात आली आहे.सर्व कर्मचारी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत, असे प्रतिपादन सहकार पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
ते पुढे म्हणाले, बँकेला शंभर वर्षांचा इतिहास असून आम्ही गेल्या पाच वर्षांपासून बँकेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. बँकेचे व्यवहार वाढविण्यासाठी शाखांची आवश्यकता असल्याने वर्षभर प्रयत्न करून शासनाच्या नियमानुसार आणि परवानगीनुसारच पारिश्वाड, बिडी आणि बेळगाव येथे शाखा काढल्या आहेत. अवघ्या तीन महिन्यात या सर्व शाखांतून मोठी उलाढाल झाली आहे. असे असताना विरोधकांकडे मुद्दाच नसल्याचे या शाखा नुकसानीत असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. बँकेने नुकताच अद्ययावत आणि सुरक्षिततेची हमी घेऊन लॉकर सुरू केले आहेत. या लॉकरचा वापर साडेतीनशे सभासदांनी सुरू केला आहे. त्यामुळे सभासदांना आणि बँकेलाही याचा फायदा झाला आहे. बँक कर्जवाटप करत नसल्याचा आरोप होत आहेत. मात्र सहकार खाते आणि रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार 50 हजार रु. पर्यंत कर्जासाठी मर्यादा आल्या आहेत. मात्र अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदांना आम्ही छोटी कर्जेही देत आहोत, असे सांगितले.
सहकार पॅनेलच्या माध्यमातून बँकेचे हित
विरोधकांच्या पॅनेलमध्ये माझे ज्येष्ठ बंधू बाळाराम शेलार आहेत. विरोधी पॅनेलमध्ये उभे राहणार असल्याचे समजताच मी स्वत: त्यांच्याशी संपर्क साधला. तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांनीही याबाबत प्रामाणिक प्रयत्न केले. आणि मी स्वत: माघार घेऊन बाळाराम यांना या पॅनेलमधून उभे राहण्यासाठी सहकार्य करणार होतो. मात्र विरोधकांनी गैरसमज करून घेतल्याने बाळाराम शेलार कोणत्याही चर्चेला आले नाहीत. माझ्या वडिलांनी बँकेचे संचालक म्हणून जवळपास 30 वर्षे काम केले आहे. त्यांनी बँकेत प्रामाणिकपणे काम केले आहे. याची जाण असल्याने मी ही प्रामाणिकपणेच बँकेत व्यवहार करत आहे. विरोधकांकडे मुद्दा नसल्याने सभासद मतदारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सहकार पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहोत. यात बँकेचे हितच आम्ही जपत आहोत. यावेळी ज्येष्ठ संचालक परशराम गुरव, डॉ. सी. जी. पाटील, मेघशाम घाडी, रमेश नार्वेकर, विजय गुरव, विठ्ठल गुरव, अंजुबाई गुरव, अंजली कोडोळी, मारुती पाटील, मारुती बिलावर, शिवाजी बुरुड उपस्थित होते.