युद्धाचे स्वरुप वेगाने बदलतेय : सीडीएस चौहान
बदल अंगिकारण्यासाठी सशस्त्र दलांना सदैव सज्ज रहावे लागणार : महाशक्ती होण्याचे उद्दिष्ट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान लढण्यात आलेल्या टोलोलिंग आणि टायगल हिलच्या लढाईला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सैन्याधिकारी, ज्युनियर कमिशन प्राप्त अधिकारी (जेसीओ) आणि 18 ग्रेनेडियर्सच्या सैनिकांच्या एका सभेला गुरुवारी संबोधित केले. तांत्रिक प्रगतीमुळे युद्धाचे स्वरुप वेगाने बदलत आहे. देशाच्या सशस्त्र दलांना हा बदल स्वीकारण्यासाठी सज्ज रहावे लागणार असल्याचे चौहान यांनी यावेळी म्हटले आहे.
टायगर हिलच्या शिखरावर भारतीय सैन्याने 4 जुलै 1999 रोजी पुन्हा नियंत्रण मिळविले होते. 18 ग्रेनेडियर्स बटालियनने कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी 26 जुलै रोजी ‘विजय दिन’ साजरा करण्यात येतो.
देशाच्या लोकांना आमच्या क्षमतांवर विश्वास आहे आणि याचमुळे आम्हाला अपार प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हा वारसा आमच्या पूर्वजांनी अर्जित केला आहे. आम्ही प्रत्यक्ष योगदान दिले नसले तरीही आम्ही त्याचे फळ प्राप्त करत आहोत. यामुळे वैयक्तिक स्वरुपात आणि समुदायाच्या स्वरुपात देखील आम्हाला जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. एक सैनिक आणि एक समुदायाच्या स्वरुपात कुठलीच चूक केली जाऊ शकत नाही, विश्वास कधीच कमी होऊ शकत नाही असे उद्गार सीडीएस चौहान यांनी काढले आहेत.
परिवर्तनाच्या युगाला सामोरे जातोय
आम्ही परिवर्तनाच्या युगातून जात आहोत. सद्यकाळात युद्धाचे स्वरुप वेगाने बदलत आहे. याचमुळे आम्हाला या परिवर्तनाला स्वीकारण्यासाठी नेहमी सज्ज रहावे लागणार आहे. आम्ही भारताला एक प्रोफेशनल सशस्त्र दल आणि एक महाशक्ती करू इच्छितो. हीच आमची इच्छा आहे. आम्ही नवी ऊर्जा, नवा उत्साह आणि नव्या विचारासोबत काम केले तरच हे शक्य आहे. परिवर्तन हेच केवळ शाश्वत आहे आणि भारतीय सशस्त्र दल या परिवर्तनापासून दूर राहू शकत नसल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.
वेगाने होत असलेल्या तांत्रिक विकासामुळे युद्धाचे स्वरुप जलदपणे बदलत आहे. भूतकाळात युद्ध जिंकण्यासाठी शौर्य एक आवश्यक घटक असल्याचे दिसून आले. परंतु भविष्याच्या युद्धांमध्ये केवळ शौर्य पुरेसे ठरणार नाही. आम्हाला लवचिक आणि कल्पनाशील व्हावे लागेल तसेच नव्या विचारांना सामावून घ्यावे लागणार आहे. अनेक शस्त्रास्त्रs अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत विकसित होत जातात, त्यानुसार रणनीति आणि कार्यनीति देखील बदलते आणि हे आता अत्यंत वेगाने घडत असल्याचे चौहान यांनी नमूद पेले.
सशस्त्र दलांवर लोकांचे प्रेम
आम्ही आम्ही बहुक्षेत्रीय युद्धाचा विचार करत आहोत. भूमी, समुद्र आणि वायू यासारख्या पारंपरिक क्षेत्रांसमवेत आमची सैन्यशक्ती वाढविण्यासाठी सायबर, विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम आणि अंतराळ क्षेत्रालाही यात सामील करण्यात आले आहे. लोक सशस्त्र दलांवर प्रेम करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात, हा विश्वास कायम राखायचा असेल तर आम्हाला बदल अंगिकारावे लागतील. आम्ही युद्धात अशयस्वी होऊ शकत नाही. खेळांच्या उलट युद्धात कुठलाच उपविजेता नसतो, कारण विजेता सर्वकाही जिंकत असतो असे वक्तव्य सीडीएस चौहान यांनी केले आहे.
सुधारणा लागू करण्याचा प्रयत्न
लोकांचा विश्वास कायम राखण्यासाठी सैनिकांना नव्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार स्वत:ला बदलावे लागणार आहे. याचमुळे सरकारने सीडीएस हे पद निर्माण केले आहे. नव्या सुधारणा लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीडीएस म्हणून माझे काम तिन्ही दलांदरम्यान एकजूटता आणि एकीकरण निर्माण करणे असल्याचे ते म्हणाले.