Jayant Patil | वर्षा’वरील भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
मुंबई - सध्या राज्यातील राजकारण वेगळे वळण घेत आहे.. नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात सगळ काही ठिक नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या तर दुसरीकडे अजित पवार गटात अध्यक्षा पदी सुनेत्रा पवार यांना केले असल्यामुळे नाराजी समोर येत होते.. अशातच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी काल रात्री अचानक 'वर्षा'वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.. या भेटीमुळे राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.. अशातच आता या चर्चांवर पुर्णविराम आमदार जयंत पाटील यांनी लावत या भेटीचे कारण सांगितले आहे..
काय म्हणाले आमदार जयंत पाटील?
आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले मतदारसंघातील एका कामासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. संबंधित व्यक्तीविरोधात अतिक्रमणाची कोणतीही नोटीस नसतानाही तक्रार करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण विषय ऐकून घेत, याकडे लक्ष देतो, असं आश्वासन दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, जयंत पाटील यांची अर्थमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारलं असता, ‘मी कशाचाच विचार केलेला नाही, मग तुम्ही पुढचा विचार का करताय?’ असा मिश्कील सवाल त्यांनी केला.
खातेवाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे अर्थमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच निर्णय घेतील, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच, आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहोत. मात्र, पक्षातील नेत्यांबाबत वारंवार अशा चर्चा होत असल्याने दुःख होतं, असंही जयंत पाटील म्हणाले.