कचरा डेपोवरील अस्वच्छतेला पालिका प्रशासनच जबाबदार
संजू परब यांचा आरोप ; “कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर स्पॉट पंचनामा; सावंतवाडी कचरा-मुक्त करण्यासाठी २५ एकर जागेची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
येथील पालिकेच्या कारीवडे येथील कचरा डेपोवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याची गंभीर दखल घेत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्पॉट पंचनामा केला. कचरा डेपोवरील अस्वच्छतेला पालिकेचे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला.यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात किमान २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. “आम्ही सूत्रे हातात घेतल्यानंतर कचरा डेपोवर आलो आहोत, गार्डनमध्ये नाही,” असा टोला त्यांनी नगराध्यक्षांचे नाव न घेता लगावला.संजू परब यांनी सावंतवाडी शहर कचरा-मुक्त व दुर्गंधी-मुक्त करण्याचा संकल्प व्यक्त करत पुढील ५० वर्षांचे नियोजन म्हणून कचरा विघटन प्रकल्पासाठी २५ एकर जागेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. यासाठी एखाद्या गावात २५ एकर जागा खरेदी करण्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच या विषयावर आमदार दीपक केसरकर यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्पॉट पंचनाम्यादरम्यान कचरा डेपोवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क व इतर आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. यावेळी आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून त्यांनाही जाब विचारण्यात आला.
गेल्या महिनाभरापासून कचरा विघटन करणारे यंत्र बंद असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे समोर आले असून यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सावंतवाडी नगरपालिकेने वेंगुर्ले नगरपालिकेप्रमाणे स्वच्छतेबाबत प्रभावी काम करावे, असे सांगत या सर्व परिस्थितीसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले.यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आदी उपस्थित होते.