For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काजू विक्रीचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम

10:37 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
काजू विक्रीचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम
Advertisement

कमी श्रमात अधिक उत्पादन देणारे पीक : बाजारपेठ-हमीभाव नसल्याने उत्पादकात चिंतेचे वातावरण

Advertisement

बेळगाव : काजू फळधारणेला प्रारंभ झाला आहे. मात्र, यंदाच्या हंगामात काजूला समाधानकारक भाव मिळणार का, या चिंतेत उत्पादक आहेत. गतवर्षी केवळ 80 रुपये किलोवर उत्पादकांना समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा तरी काजूला अपेक्षेप्रमाणे दर मिळेल का, या विवंचनेत काजू उत्पादक शेतकरी सापडले आहेत. तालुक्यातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, बाची, कुद्रेमनी, कल्लेहोळ, कोनेवाडी, बसुर्ते, अतिवाड, बेकिनकेरे, कर्ले आणि जानेवाडी आदी भागात काजूचे उत्पादन घेतले जाते. मध्यंतरी बदलत्या हवामानाचा परिणाम काजू उत्पादनावर झाला होता. त्यानंतर काजू लागवडीला प्रारंभ झाला आहे. मात्र, सद्यस्थितीत काजूचा दर 80 ते 100 रुपये किलो आहे. मात्र, काजू उत्पादकांना 150 रुपये काजूचा दर व्हावा, अशी अपेक्षा आहे. मागील चार वर्षांत काजूचा दर 100 रुपयांच्या पुढे गेला नाही. त्यामुळे यंदाही काजू उत्पादकांसमोर दराबाबत चिंता आहे. अलीकडे काजूची लागवड वाढल्याने काजू उत्पादनात साहजिकच वाढ झाली आहे. विशेषत: तालुक्याच्या पश्चिम भागात लागवड अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. डोंगर आणि लाल जमिनीत लागवडीवर भर दिला जातो. मात्र, बेळगाव तालुक्यात काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने दरवर्षी काजूविक्रीचा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण होत आहे. नाईलाजास्तव चंदगड तालुक्यातील आठवडी बाजारात मिळेल त्या दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही दरवर्षी बसू लागला आहे. त्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून काजूसाठी बाजारपेठ आणि हमीभाव द्यावा ही मागणी केवळ अपेक्षाच राहिली आहे. यंदा हंगामाला प्रारंभ झाला. काही ठिकाणी समाधानकारक काजू लागवड होऊ लागली आहे. मात्र, काजूची विक्री कुठे करावी आणि योग्य दर मिळेल का? असा प्रश्नही पडू लागला आहे.

काजू बागायती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ

Advertisement

कमी श्रमात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. त्यामुळे अलीकडे पडीक जागेतदेखील काजू बागायत वाढू लागली आहे. त्यामुळे काजू बागायती क्षेत्र दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मात्र, दरवर्षी दराचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याबरोबर विक्रीसाठी बाजारपेठ देखील नसल्याने विक्रीचा प्रश्नही उभा ठाकला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काजू विक्रीसाठी कोणतीच हालचाल करताना दिसत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे काजू विक्रीचा प्रश्न कायम आहे.

Advertisement
Tags :

.