Monsoon News ४ जूनला मान्सून धडकणार...नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशिरा येण्याचा IMD चा अंदाज
उन्हाच्या लाही लाही करणाऱ्या झळांपासून आराम देण्यासाठी मान्सून लवकरच तुमच्या दारात हजेरी लावणार आहे. पण यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा ३ दिवसांनी उशिरा येईल असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशिरा, म्हणजेच साधारण ४ जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी सांगितले. १५ मे रोजी, आयएमडीने केरळमध्ये मान्सून २६ मे रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.
मान्सूनचा असा प्रवास
मान्सून केरळमधून उत्तरेकडे सरकतो, साधारणपणे १५ जुलैच्या सुमारास संपूर्ण देश व्यापतो. या पावसामुळे कडक उन्हाचा काळ संपतो. कृषी मंत्रालयाच्या मते, भारतातील ५१% लागवडीखालील क्षेत्र, जे एकूण उत्पादनाच्या ४०% आहे, ते पावसावर अवलंबून आहे, त्यामुळे मान्सून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. देशातील ४७% लोकसंख्या आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असल्याने, मुबलक मान्सूनचा संबंध सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेशी असतो.
"४ जूनच्या सुमारास नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून, हे वारे नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचे काही अधिक भाग, लक्षद्वीप बेटे, केरळ आणि तामिळनाडूचे काही भाग, नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचे काही अधिक भाग आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये पसरतील," असे भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले.
केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
आयएमडीने म्हटले आहे की, पुढील सहा ते सात दिवसांत केरळमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस (७-२० सेंमी) पडण्याची दाट शक्यता आहे. याच काळात तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या आठवड्यात वायव्य, मध्य, पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित अंदाजानुसार, २८ मे ते ४ जून दरम्यान केरळमध्ये हवामान बहुतांशी कोरडे राहील. ४ जून ते ११ जून दरम्यान हवामानात अगदी किरकोळ सुधारणा अपेक्षित होती. पश्चिम पॅसिफिकवर विकसित होत असलेले चक्रीवादळ, जे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून लक्षणीय आर्द्रता खेचून घेत असल्याचे दिसून आले, आणि लक्षद्वीप प्रदेशावरील चक्रीय वाऱ्यांची स्थिती, हे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनास विलंब होण्यास किंवा ते कमकुवत होण्यास कारणीभूत ठरणारे संभाव्य घटक होते.