Vari Pandhrichi 2025: विठ्ठल मूर्ती लपविली होती विहिरीत
पंढरपूर / चैतन्य उत्पात :
अवघ्या विश्वाचे दैवत असलेल्या सावळ्या विठुरायावर देखील अनेक संकटे आली होती. 1581 साली मोगल सरदार अफखलखान पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भग्न करणार होता. मात्र, गुप्तहेरांनी ही वार्ता आधीच उघड केली.
अफझलखान चालून येणार म्हणून बडवे मंडळी सावध झाली. त्यांनी श्री विठ्ठलाची मूर्ती नदीपलीकडे असलेल्या देगाव येथील सूर्याजी पाटील यांच्या विहिरीत एका गुप्त कोनाड्यात लपवून ठेवली. अफझलखान पंढरपूर येथे आला. परंतु, अगोदरच मूर्ती नेल्याने तो काहीच करू शकला नाही. देगाव येथील सूर्याजी पाटील यांची ती विहीर व कोनाडा अजून आहे तसा आहे.
पुढे अफझलखान विजापूरकडे गेला आणि संकट टळले. तेव्हाच बडवे मंडळींनी श्री विठ्ठल मूर्ती पुन्हा देवळात आणली. ही मूर्ती पाटील यांनी परत दिली. याची पोच देखील त्याकाळी देण्यात आली होती. पुढे 1699 मध्ये देखील असेच संकट उभे राहिले. औरंगजेबाचा तळ पंढरपूर पासून 20 किमी अंतरावर बेगमपूर येथे होता.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देण्याच्या हेतूने यवन सरदारांनी पंढरपूर येथील मंदिरावर हल्ला चढविला. पण यावेळीही मूर्ती देगाव येथील विहिरीत हलविल्याने दोनवेळा वाचविण्यात यश आले.