उच्च न्यायालयाने ‘नीट’संबंधी विद्यार्थिनीची याचिका फेटाळली
सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका विद्यार्थिनीने सादर केलेली नीट परीक्षेसंबंधी याचिका फेटाळली आहे. आयुषी पटेल हिने ही याचिका सादर केली होती. राष्ट्रीय चाचणी परीक्षा प्राधिकरणाने आपला नीटचा निकाल घोषित केलेला नाही. कारण आपल्या उत्तरपत्रिकेचा ओएमआर शीट फाटलेले आहे. आपल्याला या परीक्षेत 715 गुण मिळाल्याचे प्रतिपादनही तिने केले आहे. हे गुण प्राधिकारणाने प्रसिद्ध केलेल्या उत्तरपत्रिकेच्या आधारे सुनिश्चित झाले आहेत, असे तिने तिच्या याचिकेत स्पष्ट केले होते. आपली गुणपत्रिका देण्यात यावी, असा अर्ज केल्यानंतर जी गुणपत्रिका देण्यात आली, त्या गुणपत्रिकेत 335 गुण आहेत, असे तिचे प्रतिपादन होते. तथापि, ही याचिका फेटाळण्यात आली.
तिच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने तिची मूळ उत्तरपत्रिका सादर करण्याचा आदेश प्राधिकरणाला दिला होता. तथापि, या विद्यार्थिनीने सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, हे न्यायालयात स्पष्ट झाले. प्राधिकरणाने न्यायालयात तिचा ओएमआर शीट सादर केला. मात्र तो कोणत्याही प्रकारे खराब किंवा फाटलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने तिची याचिका फेटाळली. तसेच प्राधिकरणाला तिच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार आहेत, हेही आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट केले. त्यामुळे आता प्राधिकरण या विद्यार्थिनीवरच कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
यंदाच्या नीट-युजी प्रवेश परीक्षा प्रकरणी अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या आहेत. यंदा या परीक्षेत अनेक गैरप्रकार घडले. प्रश्नपत्रिका फुटली. अनेक विद्यार्थ्यांना कारण नसताना ग्रेस गुण देण्यात आले. सर्वच्या सर्व गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावेळी वाजवी प्रमाणापेक्षा बरीच अधिक आहे. एका विशिष्ट परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांवर प्राधिकरणाची कृपादृष्टी असल्याचे दिसून येते, असे विविध आरोप या याचिकांमध्ये करण्यात आले आहेत. सरकारने ग्रेस गुण रद्द केले असून असे गुण देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे. यासाठी 23 जूनला पुन्हा परीक्षा होणार आहे. तसेच प्राधिकरणाने प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयात काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव्या याचिकेत संपूर्ण परीक्षाच रद्द करुन पुन्हा नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेवर केंद्र सरकार आणि प्राधिकरण यांचे प्रत्युत्तर मागविले असून तशी नोटीस काढली आहे. याप्रकरणी 8 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे.
दोन उमेदवारांची अडीच तास चौकशी
बिहारमधील नीट पेपरफुटीच्या प्रकरणात दोन उमेदवार बुधवारी आर्थिक गुन्हे युनिटच्या पाटणा मुख्यालयात पोहोचले. या दोन्ही उमेदवारांची सुमारे अडीच तास चौकशी करण्यात आली. बख्तियारपूर येथे राहणारी ईशा आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. तर दुसरी उमेदवार आपले वडील आणि काकांसोबत आली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात सहकार्य करणार असल्याचे ईशाने चौकशीपूर्वी सांगितले आहे. वडिलांसोबत आलेल्या दुसऱ्या मुलीने आपले नाव सांगितले नाही. तसेच पेपरफुटीच्या मुद्यावर बोलण्यासही नकार दर्शवला. नीट उमेदवारांसोबतच त्यांच्या पालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी तपास पथकाने 9 उमेदवारांना नोटीस पाठवून चौकशीसाठी आमंत्रित केले होते.