नेतृत्त्वाचा गोंधळ हायकमांडच दूर करेल!
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण : राहुल गांधींच्या निर्णयाला कटिबद्ध
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेसमधील नेतृत्त्व बदलाचा गोंधळ अद्याप संपलेला दिसत नाही. नेतृत्त्वाच्या गोंधळात हायकमांड हस्तक्षेप करणार नाही. स्थानिक नेत्यांनी तो सोडवावा असे विधान एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, नेतृत्वाचा गोंधळ हायकमांडच दूर करेल. राहुल गांधींनी घेणाऱ्या निर्णयाला कटिबद्ध आहे. हायकमांडने सर्वकाही सोडवावे या आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेतृत्व बदलाचा मुद्दा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीच ठरवावा. ते जे काही निर्णय घेतील त्याला वचनबद्ध आहोत, असे म्हणत सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या वादाचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात परत पाठवला आहे. राज्य काँग्रेसमधील गोंधळ, नेतृत्व बदल, या सर्व गोष्टींबद्दल मी पक्षातील वरिष्ठांशी बोललो आहे. आम्ही यावर निर्णय घेऊ, असे वरिष्ठांनी सांगितले आहेत. त्यांच्या निर्णयाला आम्ही कटिबद्ध आहोत, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
एआयसीसी अध्यक्ष खर्गे यांनी नेतृत्व बदलाचा प्रश्न स्थानिकांनी सोडवावा. यात हायकमांड हस्तक्षेप करणार नाही, असे विधान केल्यानंतरही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, सर्वकाही हायकमांडने सोडवावे. आम्ही हायकमांडच्या निर्णयाशी वचनबद्ध आहे. माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असा संदेश दिला आहे. नेतृत्व बदल ही माध्यमांची निर्मिती आहे. नेतृत्वबदलाची चर्चा माध्यमांमध्ये सर्वाधिक होत असल्याबद्दल सिद्धरामय्यांनी नाराजी व्यक्त केली.
बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनात मी विधानसभेत जे बोलायचे होते तेच बोललो आहे. सर्व काही हायकमांडकडून ठरवले जाईल असे सांगितले असतानाही या विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा करण्याची काय गरज आहे, असा प्रश्न सिद्धरामय्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानासह त्यांच्या भूमिकेमुळे प्रदेश काँग्रेसमधील गोंधळात आणखी भर पडली आहे. हे गोंधळ कोण सोडवणार, स्थानिक नेते बसून ते सोडवतील का, की हायकमांड मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेतील याची उत्सुकता आहे.