10 वर्षांमध्ये विकास दर 6-8 टक्के राहणार
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येणाऱ्या 10 वर्षात भारताचा विकास दर सहा ते आठ टक्क्यांपर्यंत कायम राहील, असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी व्यक्त केला. देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी जागतिक कंपन्यांना देशात आमंत्रित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रायसीना डायलॉग 2024’ मध्ये सांगितले की, भारत जगासाठी आणि नवीन कल्पनांसाठी खुला आहे.
ते म्हणाले, ‘भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने अतिशय चांगल्या दराने वाढत आहे. पुढील 10 वर्षांत भारत सहा ते आठ टक्के विकास दराने प्रगती करत राहील... मी हे अगदी आत्मविश्वासाने सांगू शकतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या विकास उपक्रमांवर प्रकाश टाकताना, वैष्णव म्हणाले की यासाठी पायाभरणी आधीच सुरू आहे आणि परिणाम आता दिसत आहेत.
2047 पर्यंत भारत विकसित देश होण्यासाठी पुढील पाच वर्षांत पाया रचला जाईल. पुढील पाच वर्षे संपूर्णपणे उत्पादनावर आणि तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.