सरकार योग्य त्या उपाययोजना करणार
खासदार श्रीपाद नाईक यांचे आश्वासन, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही दिली भेट
डिचोली/. प्रतिनिधी
शिरगावात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर शिरगाव येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बरोबरच भेट दिली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी या घटनेची माहिती घेऊन देवस्थान समितीचे अध्यक्ष तसेच आमदार प्रेमेंद्र शेट, पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
शिरगाव येथे संपन्न होणाऱ्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची मोठी महती आहे. या जत्रोत्सवात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक भक्तजन तसेच धोंडगण उपस्थित राहतात व आपली सेवा ऊजू करतात. मोठ्या श्रद्धेने या गावात येणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारचे पाळी येणे ही अत्यंत दु:खद अशीच घटना असून या घटनेबाबत आपणास अत्यंत दु:ख झाले आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री तसेच आपणासही फोन करून या घटनेतील मृत लोकांबद्दल विचारपूस केली तसेच जखमी असलेल्यांना उत्तम आरोग्यसेवा पुरवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून आवश्यक असलेली मदत कोणत्याही क्षणी देण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे.
शिरगाव जत्रोत्सवात होणारी गर्दी व त्यामुळे घडणारे छोट्या मोठ्या घटना या भविष्यात घडू नये व अशा प्रकारची मोठी दुर्घटना अनुभवास येऊ नये. यासाठी राज्य सरकार व मुख्यमंत्री योग्य ती पावले उचलणारच. अशा घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी यापुढे घेतली जाईल. तसेच या कामी जर केंद्र सरकारची मदत आवश्यक असेल तर तीही मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार व केंद्र सरकारही त्यासाठी सदैव तत्पर आहे, असेही केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांची बोलताना सांगितले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी शिरगावातील घटना ही अत्यंत मनाला वेदना देणारी असून या घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबाच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत. अशा घटना यापुढे घडू नये यासाठी सरकार योग्य ती खबरदारी नक्कीच घेईल, असे सांगितले.