Sangli News : चांदोलीतील भय काही केल्या संपेना...!
चांदोलीत नव्याने सोडलेल्या वाघिणीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
by भरत गुंडगे
वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली परिसर वन्य प्राण्यांच्या उद्रेकामुळे गेल्या तीन-चार वर्षापासून भीतीच्या छायेत वावरत असताना आता वन विभागाने नव्याने ताडोबातील वाघीण सोडल्याने चांदोली परिसर भीतीच्या छायेत आहे. मात्र वन विभाग याकडे दर्लक्ष करत आहे. सध्या वाघीण आपले कार्यक्षेत्र तयार करत असल्याचे वन अधिकारी सांगत आहेत
व्याघ्र प्रकल्पात वाघ सोडण्यापूर्वी स्पेशल टायगर प्रोटेशन फोर्स कार्यरत नसल्यामुळे वाघिणीच्या मुक्त संचारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याचबरोबर ताडोबाप्रमाणे नागरिकांना अर्लट सूचना देणारी यंत्रणा राबिवणे गरजचे होते. तसे काही न करता वाघ सोडल्याने आज तो मानवी वस्तीलगत आल्याने भीती आहेच. त्याच बरोबर उखळूपैकी जळके वस्ती बफरमध्ये आहे.
त्यांचा पाळीव जनावरचा पाणवठा वस्तीलगत असणाऱ्या वन विभागाच्या हद्दीलगत असल्यानेतेथे पाळीव जनावरांना सध्या त्या पाणवठ्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर या जळके वस्ती व अंबाबाईवाडी येथून सुमारे पंधरा ते वीस मुले-मुली जंगलातून किमान दहा ते पंधरा किलोमीटर वारणावती येथे माध्यमिक शिक्षणासाठी येत आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही, किंवा त्यांना तशी कल्पनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मुलांना भीतीपोटी अर्धवट शिक्षण सोडावे लागेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच येथील सुमारे ४०० पाळीव जनावराचा पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
ओढ्या नाल्याचे पाणी सुरु असल्याने सध्या जरी गंभीर प्रश्न बनला नसला तरी ऐन उन्हाळ्यात मात्र तो गंभीर होऊ शकतो. तत्पूर्वी वनविभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानिक जनता जंगली प्राण्यांच्या अति वावरामुळे भीतीच्या छायेत वावरताना दिसत आहेत. या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे
भीतीचे सावट
सध्या आसपासच्या भीतीचे सावट कायमसध्या चांदोली येथे सोडण्यात आलेल्या वाघिणीमुळे जनावरांना पाणवठ्यावर पाणी पिण्यास मज्जाव केला जात आहे. त्यातच आमच्या जनावराच्या कळपातील एक रेडकू गायब झाले आहे. तरीही वन विभाग हालचाल करण्यास तयार नाही. ते मृत आहे की जिवंत आहे, याचा ही गेल्या आठ दिवसांपासून पत्ता लागलेला नाही. वस्तीलगत वाघ घेऊन जातोय. त्याची विष्ठा व ठसे दिसत असल्यामुळे आम्हाला भीती वाटते.
दीपक गावडे, जळके वस्ती, उखळू