मंगळवार पेठेतील ‘त्या’ उद्यानाची संपूर्ण भिंत कोसळली
महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणाचा फटका, सुदैवानेच दुर्घटना टळली
बेळगाव : मंगळवार पेठ टिळकवाडी येथील उद्यानाची भिंत काही दिवसांपूर्वी अर्धवट कोसळली होती. मात्र आता झालेल्या पावसामुळे उद्यानाची संपूर्ण भिंत कोसळली आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावासामुळे भिंत कोसळली असून सुदैवानेच या घटनेमध्ये कोणी जखमी झाले नाही. या प्रकारामुळे महानगरपालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महानगरपालिकेची शहरामध्ये विविध ठिकाणी अनेक उद्याने आहेत. मात्र या उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. मंगळवार पेठ येथील हे उद्यान एक महत्त्वाचे असून सायन्स उद्यान म्हणून ओळखले जाते. या उद्यानामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. लहान मुले खेळण्याच्या विविध साहित्याचा आनंद येथे घेत असतात. मात्र महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता संपूर्ण भिंत कोसळली आहे. कोसळलेल्या भिंतीखाली महानगरपालिकेचा फलकही गाडला गेला आहे.
मनपाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण भिंत कोसळली
काही दिवसांपूर्वी अर्धवट भिंत कोसळली होती. त्यावेळी ‘तरुण भारत’मधून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी संपूर्ण भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर तरी महानगरपालिकेला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.