जिल्ह्याचे विभाजन होणार नाही
सातारा :
सातारा जिह्याची ओळख ही ऐतिहासिक जिल्हा अशी आहे. जिह्याचे गेल्या काही दिवसापासून विभाजन होणार अशी चर्चा आहे. परंतु असा कोणताही प्रस्ताव, निवेदन किंवा सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर याची अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन नुतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा जिह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यांची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिह्यात पर्यटन हा महत्त्वाचा भाग आहे. जिह्यातील पर्यटनाचा विकास होण्यासाठी नवीन धोरण आखून जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यावर भर देणार आहे. जिह्याचे पर्यटन वाढले तर रोजगार वाढून स्थानिकांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळले. यामुळे जिह्याच्या विकासातही भर पडेल. तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या कार्य काळात स्मार्ट शाळा व इतर नवीन उपक्रम, योजना जिल्हास्तरावर राबवण्यात आल्या. त्या पूर्ण करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देणार आहे. जिह्यातील यात्रा येथे पार्किगची व्यवस्था करणे, मुलभुत सोयी पुरवणे, योग्य व्यवस्थापन करणे यावर भर देणार आहे. महिलांसाठी ज्या योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवणे. त्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे यावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
- अफवांवर विश्वास ठेऊ नका
सातारा जिह्याचे विभाजन होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. परंतु राज्यपातळीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, सोशल मीडियावर नकाशाही व्हायरल झाला आहे. तो खोटा असून असा चुकीच्या गोष्टी लवकर व्हायरल होऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.