For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकरी प्रतिनिधींशी संवाद

09:57 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला शेतकरी प्रतिनिधींशी संवाद
Advertisement

रोहयो योजना कृषीमध्ये राबविण्यास सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन : त्वरित नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

Advertisement

बेळगाव : रोजगार हमी योजनेचा कृषी क्षेत्रामध्येही उपयोग व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधींची मंगळवारी बैठक घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. रोजगार हमी योजनेमुळे अनेक कुटुंबीयांना रोजगार मिळाला आहे. ही योजना ग्रामीण भागातील जनतेसाठी वरदान ठरली आहे. मात्र या योजनेमुळे शेती व्यवसायाला फटका बसला आहे. रोजगार कामगारांना अधिक वेतन दिले जात असल्याने बहुतांश गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून काम मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. परिणामी शेती व्यवसायाला मजुरांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. अधिक वेतन देऊन शेती व्यवसाय शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. यासाठी रोजगार हमी योजनेतून शेतीमध्ये कामे राबविण्यात यावीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सदर योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्येच काम करावे लागते. कृषीमध्ये रोजगार हमी योजना राबविण्यासाठी गाव पातळीवरच ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. आपणाला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागते. यासाठी शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊ, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

Advertisement

दरम्यान, पीक विमा घेऊन वर्ष उलटले तरी कृषी खात्याकडून भरपाई मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तात्काळ कृषी संचालक शिवनगौडा पाटील यांना फोनवर संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी सदर विम्याची भरपाई येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देण्यात येईल, असे सांगितले. 2022 मधील भरपाई डिसेंबरमध्ये देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर 2023 ची फसल विमा भरपाई पुढच्या डिसेंबरला देण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान यावर शेतकऱ्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. यंदा दुष्काळ असताना भरपाई देण्यास विलंब का? त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी राजू मरवे, आप्पासाहेब देसाई यासह कडोली व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.