भक्त नामस्मरणात तल्लीन होतो
अध्याय नववा
बाप्पा म्हणतात, माझी भक्ती करण्यासाठी बुद्धिमान असण्याची गरज नाही. माझ्यावर भक्ती आणि प्रेम करणारा अडाणी असला तरी प्रत्यक्षात तो विद्वानांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. ह्या अर्थाचा भक्तिश्चैवादरश्चात्र कारणं परमं मतम्। सर्वेषां विदुषां श्रेष्ठो ह्यकिंचिज्ञोऽ पि भक्तिमान् ।। 7।। हा श्लोक आपण पहात आहोत. जसजशी भक्ताची आध्यात्मिक प्रगती होत जाते तसतशी भगवद् नामातील गोडी त्याला उमगू लागते व मग आपोआपच त्याचे मन देवावर केंद्रीत होते. नाम घेत असताना तो ईश्वराशी जोडला जातो. जेंव्हा भक्ती खऱ्या अर्थाने होते तेंव्हा त्या नामाची तीव्रता जास्त वाढते. ह्याबाबतीतलं व्यवहारातलं उदाहरण म्हंटलं तर जेव्हा एखादा मनुष्य घर बांधत असतो तेव्हा तो ते काम तन, मन, धन ओतून करत असतो, दिवसभर तो त्या व्यवधानात असतोच पण रात्री त्याला स्वप्नेही त्याचीच पडत असतात, त्यामुळे आपण घर बांधतोय हे त्याला लक्षात ठेवावं लागत नाही.
त्याप्रमाणे ज्याचे मन नामस्मरणावर केंद्रीत होते, त्याला नाम घेण्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज रहात नाही. तो नामाशिवाय इतर कोणतीच गोष्ट बोलत नाही इतके नाम त्याच्या हाडीमासी खिळलेले असते. त्याचं असं हे आपल्याशी जोडून घेणं ईश्वराला फार आवडतं. त्याची भक्ती आणि ईश्वराविषयी आदर हे दोन मुद्दे एव्हढे महत्त्वाचे ठरतात की, त्याच्यापुढे विद्वानांची विद्वत्ता कवडीमोल ठरते. भक्ती करण्याचे नऊ प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्याही प्रकारे केलेली भक्ती देवाला प्रिय असते. नवविधा भक्तीबद्दल भागवतात भक्त प्रल्हाद पुढील प्रसिद्ध श्लोक सांगतात तो असा,
श्रवणं किर्तनम विष्णो: स्मरणम पाद सेवनम्।अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् । इति पुंर्सार्पिता विष्णौ भक्तीश्चेण्णवलक्षणा । क्रियेत भगवत्यध्दा तन्मन्येएधीतमुत्तमम् । प्रल्हाद महाराज म्हणतात, श्रवण्, किर्तन, स्मरण, भगवद्चरणाची सेवा, षोडपशोपचार पूजा, प्रार्थना, वंदना, विष्णुचे दास्य, विष्णुला स्वत:चा सखा समजणे, सर्व काही त्याला अर्पण करणे, या नऊ पध्दती निस्सिम भक्तीच्या दर्शक आहेत. ज्या माणसाने या पध्दती अनुसरुन आपले जीवन विष्णुला अर्पण केले आहे त्याला सर्वोत्तम मानण्यात यावे कारण त्याने सर्व ज्ञान मिळवलेले असते.
ज्याला ईश्वराबद्दल अनन्य भक्ती व अतीव आदर असतो तो वरील सर्वप्रकारे ईश्वराची भक्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तो सहजगत्या भक्तीच्या एकप्रकारातून पुढील प्रकार साधत असतो, त्याला ईश्वराविषयी किंवा त्याच्या भक्तीच्या प्रकाराविषयी प्रतिकूल बोलणं ऐकणं किंवा विरुद्ध कृती करणं त्याला मुळीच मान्य असत नाही. चुकून तसं झालंच तर तो तेथून निघून जातो. इश्वरमय होण्याची प्रत्येक संधी तो वरील नवविधा भक्तीतून साधत असतो.
सतत ईश्वराविषयी, त्यांच्या लीलांविषयी ऐकणं हा त्याचा छंद असतो. त्यांचं कीर्तन ऐकताना तो इतका तल्लीन होतो की नंतर तो स्वत: त्याविषयी कीर्तनातून सांगू लागतो. ऐकलेलं, बोललेलं त्याला सतत आठवू लागतं. त्यातून तो स्मरणभक्ती साधतो. अवतार घेतलेला असताना प्रत्येक प्रसंगात भगवंत कसे वागले होते त्यानुसार त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात वागण्याचा प्रयत्न करून तो पादसेवनभक्ती साधतो. असं करण्यामागे भगवंत कधीही चुकीचं वागणार नाहीत अशी पक्की भावना त्यामागे असते. म्हणून ‘जे जे आचरती श्रेष्ठ ते तेचि इतरेजन’ या भगवंतांच्या गीतेतल्या उक्तीला अनुसरून तो डोळे मिटून, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांचं अनुकरण करतो. जमेल तशी त्यांची षोडशोपचारे पूजा करून अर्चनभक्ती साधतो.
क्रमश: