धबधब्यांवर बंदीचा निर्णय चुकीचा
पर्यटन खात्याला विश्वासात घेतले नाही
पणजी : पर्यटन खात्याला विश्वासात न घेता राज्यातील धबधब्यांवर बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे निवेदन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले आहे. या बंदीला त्यांनी आक्षेप घेतला असून त्याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, या बंदीमुळे वनखाते आणि पर्यटन खाते यांच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे. खंवटे म्हणाले की, धबधबे पावसाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे असून तेच जर बंद केले तर पर्यटक येणार नाहीत आणि पर्यटन वाढणार नाही. धबधब्यांमुळेच ग्रामीण भागातील पर्यटन वाढते शिवाय पर्यटकांमुळे अनेकांचा व्यवसाय होतो. त्यालाही या बंदीच्या निर्णयामुळे फटका बसणार आहे. कोणीतरी मुख्य वनसंरक्षक कोणताही विचार न करता धबधब्यांवरील बंदी आदेशावर सही मारतो आणि निर्णय करतो हे चुकीचे असून ग्रामीण अर्थव्यवस्था धबधब्यांवर अवलंबून आहे. तसेच तेथील गाडेकार पर्यटकांवर विसंबून आहेत. असा एकतर्फी निर्णय घेणे चुकीचे असून एकमेकांना विचाऊन निर्णय घेण्याची गरज असते. पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे खंवटे यांनी नमूद केले.
धबधब्यांवरील बंदी आवश्यकच : राणे
कमी धोका आणि सुरक्षित असलेल्या धबधब्यांवर जाण्यासाठी बंदी नाही, परंतू धोकादायक धबधब्यांवर बंदी हवीच, कारण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आपण या विषयावर चर्चा केल्याची माहिती देऊन राणे म्हणाले की, कमी धोकादायक असलेल्या धबधब्यांवर जाण्यास मोकळीक आहे. लोकांचे आणि प्रामुख्याने पर्यटकांचे जीव वाचवणे हे प्रथमदर्शनी महत्त्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी नंतर येतात. लोकांनी, पर्यटकांनी देखील त्याचे भान ठेवायला हवे असेही राणे यांनी म्हटले आहे.