For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निमित्याला धनी केला असे प्राणी । माझे म्हणुनी व्यर्थ गेला

06:52 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
निमित्याला धनी केला असे प्राणी । माझे म्हणुनी व्यर्थ गेला
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

अथैतदप्यनुष्ठातुं न शक्तोऽ सि तदा कुरु । प्रयत्नत: फलत्यागं त्रिविधानां हि कर्मणाम् ।। 13 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार बाप्पा भक्ताला म्हणतात, कर्म मला अर्पण करण्यास तू समर्थ नसलास तर त्रिविध कर्माच्या फलाचा प्रयत्नत: त्याग कर. कर्मे कायिक, वाचिक व मानसिक अशी तीन प्रकारची असतात. त्यापैकी शरीराने करावयाची, म्हणजे कायिक कर्मे मनुष्याला जास्त महत्त्वाची वाटतात. कारण त्याचे चांगले वाईट परिणाम लगेच दिसून येतात. आपल्या भक्ताच्या हातून चांगले कर्म केल्यावर त्याला त्यापासून चांगले फळ अपेक्षित असणार व तो त्याच्या मोहात गुंतून पडणार हे ओळखून बाप्पांनी फळाचा त्याग कर असा उपदेश केलेला आहे. तसेच फळ बाप्पांना अर्पण करायचं आहे असं ठरवलं की, तो दुष्कर्मापासून आपोआप परावृत्त होईल अशी बाप्पांची योजना आहे. मनुष्य कायिक कर्माला जास्त महत्त्व देतो पण पुढील दोन प्रकार खरे महत्त्वाचे आहेत. कारण माणसाची मन:शांती त्यावर जास्त अवलंबून असते. वाचिक कर्म म्हणजे कुणाला तरी टाकून बोलणे, शिवीगाळ करणे मनुष्य रागारागात किंवा अधिकाराचा दुरुपयोग करताना असे करतो पण नंतर आपण कुणाला तरी दुखावलंय ही गोष्ट त्याच्या मनाला कुरतडत राहते. कर्माच्या मानसिक या तिसऱ्या प्रकारात मनुष्य कुणाचं तरी वाईट व्हावं असं चिंतत असतो. माणसाच्या चिंतण्यानं असं घडतंच असं नाही पण असं एखाद्याचं वाईट चिंतून तो ईश्वरापासून दूर जातो एव्हढं मात्र नक्की. अशा प्रकारे कायिक, वाचिक, मानसिक ह्या तीनही प्रकारच्या कर्माची फळे माणसाला अडचणीत आणतात.

तेव्हढ्यापुरतं जरी बरं वाटलं तरी दूरदृष्टीने विचार केला तर कर्मफळे माणसाच्या उद्धारात मोठाच अडथळा निर्माण करतात. म्हणून बाप्पा भक्ताला त्यांचा त्याग कर आणि माझा आवडता हो असा उपदेश करत आहेत. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे सांगायलाही ते विसरत नाहीत कारण माणसाला केलेल्या कर्माबद्दल फळाची अपेक्षा असते. एव्हढंच नव्हे तर अवाजवी म्हणजे केलेल्या कर्माच्या प्रमाणापेक्षा जास्तीची अपेक्षा असते असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. साहजिकच बहुतेक वेळा अपेक्षित फळ मिळत नसल्याने मनुष्य नाराज होतो आणि मन:शांती घालवून बसतो. म्हणून बाप्पांनी कायिक, वाचिक वा मानसिक यापैकी कोणत्याही कर्माच्या फळाचा त्याग कर असा उपदेश केला. एकूण सर्व परिस्थिती बघितल्यावर फळाविषयी अभिलाषा न बाळगता त्याचा त्याग केलेलाच माणसाच्या हिताचं आहे हे लगेच लक्षात येते पण मी कर्ता आहे ही भावना माणसाच्या मनातून सहजी जात नसल्याने मी कर्म केलंय मग फळाची अपेक्षा करणं साहजिक आहे असा विचार माणसाच्या मनात दृढ झालेला असतो व त्यामुळे कर्मफळाचा त्याग अवघड होऊन बसतो. तसा विचार केला तर आपल्यात वसलेला ईश्वर आपल्याकडून सर्व कर्मे यंत्रवत करून घेत असतो मग आपण मी कर्म केलंय म्हणून अपेक्षित फळ मला मिळालं पाहिजे या म्हणण्याला काय अर्थ आहे? याला दुजोरा देताना, गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात की, खरा कर्ता मी आहे.

Advertisement

ज्यांना मारण्यामुळे तुला पाप लागेल असं तू म्हणतोयस ना, त्यांना मी आधीच मारलेलं आहे. ते म्हणतात, म्हणूनि तू ऊठ मिळीव कीर्ति । जिंकूनि निष्कंटक राज्य भोगी? मी मारिले हे सगळे चि आधी । निमित्त हो केवळ सव्य-साची ।। 11.33 ।। तुकाराम महाराजही म्हणतात, निमित्याला धनी केला असे प्राणी। माझे माझे म्हणुनी व्यर्थ गेला। या सगळ्याचा मतितार्थ एव्हढाच आहे की, माणसाने केलेल्या कर्माच्या फळाच्या अपेक्षेत गुंतून मन:शांती घालवून बसू नये. पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, मन:शांती ही सर्वश्रेष्ठ होय.

क्रमश:

Advertisement
Tags :

.