राम मंदिर ट्रस्टच्या बैठकीकडे देशाचे लक्ष
चंपत राय यांच्या राजीनाम्यासह महत्त्वाच्या विषयांवर आज होणार चर्चा : देणगी अपहार प्रकरणानंतर पहिलीच बैठक
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, 6 जुलै रोजी मणिराम दास छावणीत होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास भूषवतील. तसेच महासचिव चंपत राय यांच्या जागी ट्रस्टचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी हे बैठकीचे कामकाज पाहतील. राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणानंतर चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या बैठकीतील निर्णयाकडे संपूर्ण देशाचे आणि रामभक्तांचे लक्ष लागलेले आहे.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांवर विचार करणे हा सभेचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा आहे. ट्रस्टचे सदस्य बहुमताने त्यांचे राजीनामे स्वीकारायचे की नाकारायचे याचा निर्णय घेतील. जोपर्यंत ट्रस्ट औपचारिकपणे वेगळा निर्णय घेत नाही, तोपर्यंत दोघेही तांत्रिकदृष्ट्या ट्रस्टचे सदस्य राहतील. यापूर्वी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेपासून महासचिव चंपत राय हे सर्व सभांची तयारी करणे, अजेंडा ठरवणे आणि सभा आयोजित करण्याची जबाबदारी पाहत होते. तथापि, त्यांच्या राजीनाम्यानंतर खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी यांनी सभेची सूचना जारी करण्याची आणि अजेंडा ठरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याची सूचना
सर्व ट्रस्ट सदस्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. वय आणि आरोग्याच्या कारणांमुळे ज्येष्ठ विश्वस्त के. परासरन ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जर इतर सदस्य अयोध्येला पोहोचू शकत नसतील, तर त्यांच्या व्हर्च्युअल सहभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणानंतर होणारी ही बैठक ट्रस्टसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्याबाबत ट्रस्ट काय निर्णय घेते, तसेच मंदिराच्या प्रशासकीय आणि आर्थिक व्यवस्थापनाबाबत पुढील कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
विश्वस्तांच्या राजीनामा मंजुरीची प्रक्रिया
ट्रस्टच्या नियमांनुसार, केवळ राजीनामा दिल्याने विश्वस्ताचे पद संपुष्टात येत नाही. संबंधित सदस्याने किमान एक महिना आधी लेखी सूचना देणे आवश्यक आहे. त्यानंतर ट्रस्ट बोर्ड आपल्या पुढील बैठकीत राजीनाम्यावर विचार करते आणि तो स्वीकारायचा की नाकारायचा याचा निर्णय घेते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या विश्वस्ताला पदावरून दूर करायचे असेल, तर कारणे दाखवा नोटीस बजावून विश्वस्ताला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. ट्रस्टच्या दोन-तृतीयांश बहुमताने अंतिम निर्णय घेतला जातो.