तीन महिन्यांनी हटली आचारसंहिता
लोकसभा निवडणूक प्रक्रिया समाप्त : आयोगाकडून आदेश जारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच गुरुवारी संध्याकाळी भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 चे कलम 73 अंतर्गत आयोगाकडून जारी अधिसूचनेची एक प्रत राष्ट्रपतींना सोपविली. यात 18 व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व 543 लोकसभा खासदारांची नावे नमूद होती. याचनंतर आयोगाकडून देशभरात 16 मार्चपासून लागू असलेली आचारसंहिता देखील 6 जून रोजी संध्याकाळी त्वरित प्रभावाने हटविण्यात आली आहे.
आयोगाकडून राष्ट्रपती भवनाचे कॅबिनेट सेक्रेटरी, सर्व 36 राज्यांचे मुख्य सचिव अणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला या आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे देशभरात लागू आचारसंहिता हटविण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. यात विधानसभा निवडणूक झालेल्या राज्यांचाही समावेश होता. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी गुरुवारी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आहे. यानंतर तिघे आणि आयोगाचे अन्य अधिकारी राजघाट येथे पोहोचले, तेथे त्यांनी महात्मा गांधी यांना नमन केले आहे. राष्ट्रपतींनी निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक करविण्यासाठी आयोगासोबत या पूर्ण प्रक्रियेत सामील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.