For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्रपटगृहे कोल्हापुरची...

10:47 AM May 09, 2025 IST | Radhika Patil
चित्रपटगृहे कोल्हापुरची
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद :

Advertisement

मंगळवार पेठेतल्या विठ्ठलाच्या मंदिरामागे एक नाट्यागृह होते. मरगु अण्णा सरगर तेचालवत होते .पॅलेस थिटर झाल्यावर म्हणजेच केशवराव भोसले नाट्यागृह झाल्यावर या मरगुआण्णाच्या नाट्यागृहाचा परवाना रद्द झाला. आणि त्या ठिकाणी एक चित्रपटगृह बांधले म्हणण्यापेक्षा आहे त्या जागेला चित्रपटगृहाचे स्वरूप दिले.

या चित्रपट गृहाचे नाव हंस. त्यावेळी मूक चित्रपटांचा जमाना होता .पण 1932 ला राजा हरिश्चंद्र हा पहिला बोलपट तयार झाला. आणि या हंस टॉकीज मध्ये सलग आठ ते दहा आठवडे हा चित्रपट गर्दी खेचून गेला. पडद्यावर बोलणारे चित्र हा प्रकारच नवा होता. त्यामुळे आसपासच्या ग्रामीण भागातून लोक बैलगाडीने चित्रपट पहाण्यासाठी येत होते. काही कारणाने हंस टॉकीज बंद पडली आणि तेथे जलसा केंद्र सुरू झाले. मंगळवार पेठेला असले वातावरण नवे होते. त्यामुळे हे जलसा केंद्रही बंद झाले. काही दिवसांनी तेथे एक साबणाची फॅक्टरी निघाली त्यानंतर पोहे चिरमुरे फुलवायची भट्टी सुरू झाली आणि बरेच दिवस ही जागा पडून राहिली.

Advertisement

आता ही जागा म्हणजे आत्ताचे गणेश मंगल कार्यालय. 1965 ला बापू नवरे यांनी ही जागा घेतली. बापूंना लोकांनी खुळ्यात काढले. या जागेत रात्री नव्हे तर दिवसाही भुते दिसतात अशी काहीनी भीती घातली. आपल्या गावातला एखादा माणूस नव काहीतरी करतोय म्हटले की हजार अडथळे निर्माण करायचे व बाहेरून येणाऱ्याला पायघड्या घालून आत घ्यायचं हा कोल्हापुरातला काही जणांचा ट्रेंड बापू नवऱ्यांना माहित होता. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय ठाम ठेवला. 1965 ते 1966 हे एक वर्ष त्यांनी जागेची स्वच्छता करण्यात घालवली आणि मूळ रचना न बदलता त्या ठिकाणी गणेश मंगल कार्यालय सुरू केले. गणेश मंगल कार्यालय म्हणून ते पुढे चालत राहिले.

आज ही हे कार्यालय एखाद्या छोट्या चित्रपट गृहाप्रमाणेच दिसते. एककावन रुपयात लग्न हा एक वेगळा प्रकार या गणेश मंगल कार्यालयात राबवला गेला. त्यामुळे गोरगरिबांचे अनेक विवाह याच मंगल कार्यालयात झाले. कोल्हापुरातील चित्रपट सृष्टीला फार जुनी व दर्जेदार परंपरा आहे. बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी द्वारे सैरंध्री या चित्रपटाची निर्मिती झाली आणि मंगळवार पेठेतच प्रभात या चित्रपट कंपनीची स्थापना झाली.

व्हीनस टॉकीज सुरू झाली त्यावेळी नुकतीच शाहूपुरी व्यापारी पेठेची स्थापना झाली होती .स्टेशन रोड बरोबरच शाहूपुरीच्या अन्य भागाची रचना झाली होती . तय्यब अली बोहरी यांनी पत्र्याचे भक्कम शेड मारून व्हिनस चित्र मंदिराची त्याआधी सुरुवात केली होती. मुक चित्रपटाचा तो काळ होता. चित्रपटाबद्दल फारशी आकर्षण नव्हते. त्यात व्हिनस .टॉकीज शहराच्या बाहेर जयंती नाल्याच्या काठावर. यामुळे चित्रपट बघायला लोक यायचे नाहीत. मग तयब अली बोहरी यांनी कल्पना लढवली त्यांनी चित्रपट पाहायला लोक यावेत म्हणून त्या वेळच्या रविवार वेशीत, (बिंदू चौक ) एक गाडी ठेवली त्या गाडीतून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी फुकट आणले जायचे व चित्रपट सुटल्यावर परत सोडले जायचे.

एक शोवरलेट गाडी त्यासाठी वापरली जात होती. त्यांनी आणखी एक नवी कल्पना राबवली. चित्रपटाच्या मध्यंतरात आगामी नवीन चित्रपटाचा ट्रेलर दाखवायची एक पद्धत होती पण तय्यब अलीनी 1932 च्या काळात चित्रपटाच्या मध्यंतराच्या वेळेत चक्क नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. मध्यंतराच्या पंधरा मिनिटांच्या काळात उडत्या चालीच्या तालावर नर्तिका नृत्य करायच्या आणि त्यामुळे शहरातले एक प्रमुख करमणुकीचे केंद्र म्हणून नाव मिळवले. या चौकाचे नाव छत्रपती राजाराम चौक असले तरी अजूनही व्हीनस कॉर्नर म्हणूनच त्याची ओळख आहे.

व्हिनस नंतर शहा यांच्या उषा चित्र मंदिराची उभारणी झाली. 1948 49 च्या दरम्यान व्हिनस समोरच तय्यबअली बोहरीनी अन्वर या नावाचे दुसरे चित्रपट बांधले .नंतर त्याचे नाव बदलूनलिबर्टी करण्यात आले. काही काळ श्री गोस्वामी यांनी हे चित्रपट गृह चालवले पण चित्रपटगृह पुन्हा बोहरींच्या ताब्यात आल्यावर त्याचे अप्सरा असे नाव नामकरण करण्यात आले. या चित्रपटगृहाच्या बांधकामासाठी भंगार बोटीतील भंगार ठरलेल्या पण अतिशय भक्कम अशा लोखंडी साहित्याचा वापर करण्यात आला. शिवाजी रोडवरून बिंदू चौकाकडे जाताना उजव्या हाताला कमल टॉकीज होती,. त्याची स्थापना कधी झाली हे समजू शकले नाही. पण सबनिसांच्या जागेतील हे चित्रपट गृह श्रीधर शेट्टी चालवत होते. या चित्रपगृहाचे पहिले नाव अमेरिकन इंडिया. त्यानंतर त्याचं नाव शिवाजी आणि नंतर कमल ठेवण्यात आले. 1951-52 सुमारास हे चित्रपटगृह बंद पडले आणि चित्रपटगृहाची जागा मेरवाडे यांनी घेतली. अजूनही चित्रपट गृहाच्या पडद्याची जागा या इमारतीत मूळ स्थितीत आहे. आता या इमारतीत फोटो फ्रेमची जी दुकाने आहेत तेथे चित्रपटाची पोस्टर काचेत लावली जात होती. प्रोजेक्टर ज्या ठिकाणी असायचा तिथे आता पेंटरचे दुकान आहे.

लक्ष्मीपुरीच्या परिसरात पहिले चित्रपट गृह रुईकर यांचे रॉयल. त्यानंतर दादासाहेब निंबाळकर यांचे राजाराम. त्यानंतर नानासाहेब इंगळे यांचे पद्मा आणि भोसले यांचे शाहू अशी चित्रपटगृहे उभा राहिली. दादासाहेब निंबाळकर यांनी तर शांत किरण स्टुडिओत चित्रपट निर्मिती केली होती. इंगळे यांच्या पद्मा चित्रपट गृहास न्यू टॉकीज असे म्हणत होते पण राजकन्या पद्माराजे यांचे नाव कर्नल नानासाहेब इंगळे यांनी आपल्या चित्रपटगृहास दिले.

रावबहादूर डीएम भोसले यांच्या शाहू टाकीचे उद्घाटन 1946 ला शहाजी महाराजांच्या राज्याभिषेका दिवशी करण्यात आले. या उमा टॉकीजचे मूळ नाव संध्या. पापा परदेशी यांची ही टॉकीज पण नंतर त्यांनी बाबा नाडगोंडा यांना ती विकली. त्यानंतर टॉकीजचे नाव उमा चित्र मंदिर ठेवण्यात आले. इंग्रजी चित्रपटाचे माहेरघर म्हणून उमा टॉकीजने आपली ओळख कायम ठेवली. मॅकानाज गोल्ड हा चित्रपट पहाण्यासाठी सकाळपासून रांग लागायची .त्यानंतर शहरात सरस्वती ,लक्ष्मी बसंत, बहार पार्वती, संगम ही चित्रपट गृहे उभारली. लक्ष्मी टॉकीजचे नाव अलीकडे उर्मिला असे ठेवण्यात आले. शनिवार पेठ पोस्ट ऑफिस ज्या ठिकाणी आहे तेथेही चित्रपट होते पण त्याची माहिती मिळू शकली नाही. कोल्हापुरात फक्त चित्रपटगृह होती असे नव्हे तर चित्रपट निर्मितीही होत होती. खरी कॉर्नर परिसरात बाबुराव पेंटर यांचे चित्रपटगृह होते त्याचा वापर स्टुडिओ सारखाही होत होता. आणि त्या ठिकाणी काही चित्रपटांची निर्मितीही झाली.

कोल्हापुरात बसंत बहार टॉकीजही वातानुकूलित होती या टॉकीजमध्येही साऊंड सिस्टिम आधुनिक होती. उमा टॉकिजमध्ये पडद्यावर एक पडदा होता. तो पडदा हळूहळू उघडायचा. उमा टॉकिजमध्येच बॉक्स नावाची एक बैठक व्यवस्था होती त्यात फक्त दोघांनाच बसता यायचे. या बॉक्सचे बुकिंग कायम फुल असायचे. संगम टॉकिज पुणे बंगळूर रोडवर होती. एकदा या टॉकिजचे छतच कोसळले होते. राजाराम शाहू पद्मा व रॉयल या चार टॉकीजच्या चौकात ब्लॅकने तिकीट विकण्रायांची हुकुमतच होती. सुशिला या महिलेचा ब्लॅकने तिकीट विकण्यात दादागिरीच असायची. काही वर्षांपूर्वी या सुशीलाचे नाव असलेला सुशीला हा चित्रपट अनंत माने यांनी निर्माण केला. हा चित्रपट खूप गाजला.

बसंत बहार टॉकिजमध्ये पहिला सिनेमाठ बॉबी लागला. डिंपल कापडिया हिचा हा पहिला चित्रपट. तीचे फुल साईझचे टॉकिज वर लावलेले पोस्टर पहाण्यासही गर्दी होत होती. बाबु जमाल दर्ग्याजवळचे खंबाळा तलाव मुजवुन तेथे लक्ष्मी सरस्वती टॉकीज बांधली गेली.

  • पहिले वातानुकूलित चित्रपटगृह

कोल्हापुरात पहिले वातानुकूलित चित्रपटगृह पार्वती टॉकीज. ही टॉकीज म्हणजे अक्षरश: कोल्हापुरातील नव्या बदलाची सुरुवात होती. पार्वती टॉकीजमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या एक गार वाऱ्याची सुखद झळ अंगावर यायची आणि चित्रपटगृहाची साऊंड सिस्टिम अशी की, चित्रपटातील एखाद्या दृश्यात गोळीबाराचा प्रसंग असला तर गोळी काड काड आवाज काढत आपल्याला घासून गेली की काय असे वाटण्यासारखी साऊंड सिस्टिम प्रभावी होती. पिंजरा या चित्रपटाने या चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले.

  • रोज खचणारी टॉकीज...

लक्ष्मी चित्रपटगृहात दिलीप कुमारचा गोपी चित्रपट लागला. या टॉकीजचे उद्घाटन झाले. पण ही टॉकिज मुजवलेल्या तळ्यात रोज जरा जरा खचते. अशी दंतकथा कोल्हापुरात होती. सरस्वती टॉकिजमध्ये एक खून झाला होता. सगळे प्रेक्षक धुम पळत बाहेर पडले होते. गाजलेला शोले चित्रपट उषा टॉकिजला लागला. बच्चन व धर्मेंद्र यांचे चाहते खुर्च्या बडवून आपले त्यांच्यावरील प्रेम दाखवत होते.

आता कोल्हापुरात रॉयल, प्रभात , शाहू, सरस्वती व रिलायन्स व डी वाय पी मॉलमध्ये चित्रपटगृहे चालू आहेत.

Advertisement
Tags :

.