जखमी पोलीसांच्या अपत्यांचा आक्रोश
दिल्लीतील आंदोलन विद्यार्थ्यांचे नव्हे. तर गुंडांचे ‘ पोलिसांच्या कुटुंबियांनी केला आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने केलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून गुंडांचे होते, असा गंभीर आरोप या दंगलीत गंभीर जखमी झालेल्या पोलिसांच्या अपत्यांनी आणि कुटुंबियांनी केला आहे. या दंगलीत जखमी झालेल्या जवळपास 150 पोलिसांच्या तरुण अपत्यांनी आता त्यांची आघाडी उघडली असून पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचे काही निवृत्त अधिकारी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात आहेत.
या दंगलीत गंभीर जखमी झालेल्या दिल्लीतील एका पोलीस उपनिरीक्षकांच्या मुलीने दिल्लीत पत्रकार परिषदेचे आयोजन शुक्रवारी केले होते. या पत्रकार परिषदेत तिने 20 जुलैच्या संसदेवरील मोर्चात नेमके काय घडले, याची माहिती दिली. माझे पिता या दंगलीत गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मोर्चातील जमावाने हल्ला केला. माझ्या पित्याने गेली अनेक वर्षे विविध क्षेत्रांमध्ये देशाची सेवा करुन नंतर पोलिस विभागात प्रवेश केला आहे. पोलिसात येण्यापूर्वी ते भारतीय नौदलात सागरी कमांडो होते. त्यांनी भारतीय नौदलात 25 वर्षे सेवा दिली आहे. त्यांना आंदोलनात लक्ष्य करण्यात आले. ते आंदोलकांना शांत करण्यात आघाडीवर होते. पण आंदोलकांनी त्यांच्यावरच दगडफेक केली. ते गंभीर जखमी झाले असून ते घरी आले तेव्हा त्यांचे कपडे रक्ताने माखलेले होते. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून गुंडांचे असल्याचे दिसत आहे, असे उद्गार त्यांनी काढल्याचे त्यांच्या मुलीचे म्हणणे आहे. 25 जुलैलाही माझे वडील त्यांच्या कामावर गेले असताना, त्यांना जमावाने खेचून पाडले आणि त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका मोठा होता, की त्यांचा मृत्यू ओढवण्याची शक्यता होती. ते कसेबसे वाचले आहेत. हल्ल्यानंतर ते चार तास बेशुद्धावस्थेत होते, असेही प्रतिपादन त्यांच्या मुलीने पत्रकारांसमोर केले.
पित्याचा शाब्दिक अपमानही
ज्या आंदोलकांनी माझ्या पित्यावर हल्ला केला, तेच आता त्यांना गुन्हेगार ठरवित आहेत. त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे. माझे पिता, तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रकरणे सादर करण्याची आंदोलकांकडून तयारी केली जात आहे. यामुळे मी मानसिक दडपणात आहे. आंदोलकांनी पोलीसांवर हाती सापडल्या त्या सर्व वस्तूंनीशी हल्ला केल्याचे दिसून येत आहे. याच आंदोलनात जखमी झालेल्या अन्य पोलिस अधिकाऱ्याची पत्नी सीमा यांनीही त्यांची व्यथा मांडली आहे. आंदोलन शांतपणे व्हावे हे सुनिश्चित करण्यासाठी माझ्या पतीची नियुक्ती जंतरमंतरवर करण्यात आली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलकांना डिवचले नव्हते. तरी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. फ्लॉवरपॉटस्, दगड आणि हाती सापडतील त्या सर्व वस्तू पोलिसांवर हल्ला करण्यासाठी उपयोगात आणल्या गेल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.