भाजपचे विजय गोव्यासाठी सूचक संदेश
भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगाल आणि आसाममधील विजय हे केवळ त्यांच्या निवडणूक आकड्यांमध्ये झालेली आणखी एक भर नसून, राजकारण कसे लढले जाते आणि जिंकले जाते यातील एका मोठ्या बदलाचे ते द्योतक होय. गोव्यात पश्चिम बंगाल आणि आसाममधील विजयाचा आनंदोत्सव साजरा करतानाच जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. गोव्यात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी हे निकाल मार्गदर्शक आहेत तसेच एक इशाराही देतात.
ज्या राज्यात ऐतिहासिकदृष्ट्या प्रादेशिक अस्मितेने राजकीय निष्ठेला आकार दिला आहे, तिथे भाजपने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या दीर्घकाळ प्रस्थापित राजवटीला अत्यंत कुशलतेने पदच्युत केले. दरम्यान, आसामने ईशान्य भारतावरील भाजपची वाढती पकड पुन्हा एकदा सिद्ध केली, जो प्रदेश एकेकाळी राष्ट्रीय राजकीय गणितांच्या परिघावर होता. अनेक दशकांपासून, पश्चिम बंगालसारखी राज्ये राष्ट्रीय पक्षांसाठी अभेद्य मानली जात होती. या निवडणुकीने असा मतदारवर्ग दाखवला आहे, जो कल्याणकारी योजना, सुशासन आणि अस्मिता यांभोवती रचलेल्या राष्ट्रीय विचारप्रणालींकडे आकर्षित झाला आहे.
भाजपने पारंपरिक आसामी राष्ट्रवाद आणि हिंदुत्व यांच्यात यशस्वीपणे समन्वय साधला आहे, ज्यामुळे हिंदू मतांचे मजबूत एकत्रीकरण झाले आहे. तसेच, टीएमसीकडून होणाऱ्या कथित अल्पसंख्याक तुष्टीकरणाविऊद्ध बंगाली हिंदूंचे एकमेव संरक्षक असल्याची प्रतिमाही त्यांनी यशस्वीपणे तयार केली. उत्तर बंगाल आणि सीमावर्ती जिह्यांसारख्या प्रदेशांमधील वाढलेले मतदान आणि ध्रुवीकरण भाजपच्या फायद्याचे ठरले. भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांव्यतिरिक्त इतर प्रदेशांमध्ये प्रवेश करणे हा संघ परिवाराचा दीर्घकालीन प्रयत्न राहिला आणि या प्रयत्नात ते यशस्वी झाले. तामिळनाडूमध्येही त्यांना चांगले यश मिळाले आहे.
गोव्याच्या राजकारणाची स्वत:ची एक लय नेहमीच राहिली आहे, कारण ते मोठ्या प्रमाणावर पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिपूजक राहिले आहे. परंतु आता हे अभेद्य कवच पातळ होत आहे आणि नवीन चेहरे आपली उपस्थिती दर्शवत आहेत. गोव्यासारख्या ठिकाणी, जिथे लोकसंख्याशास्त्रीय घटक निर्णायकपणे निकालांवर परिणाम करू शकतात, तिथे अशा प्रकारचे एकत्रीकरण होण्याची शक्मयता कमी आहे, परंतु तसे झाल्यास, पारडे मोठ्या प्रमाणात झुकू शकते. तज्ञांच्या मते, राज्यात सध्या दिसणारी जातीय संघर्ष ही त्या दिशेने उचललेले एक सुनियोजित पाऊल आहे. त्यातून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
भाजपच्या विकास आणि नागरिक कल्याणाच्या संदेशामुळे विरोधी पक्षांना त्याला आव्हान देण्यासाठी अनेकदा फारच कमी वाव मिळाला आहे. गोव्यात याचा अर्थ असा होईल की, पक्षांनी भाजपवर टीका करण्यापलीकडे जाऊन एक स्पष्ट आणि विश्वासार्ह पर्याय सादर करावा लागेल. सध्या आत्मविश्वासाने भारलेल्या भाजपच्या सुसंघटित यंत्रणेसमोर, विरोधी पक्ष जर विस्कळीत राहिला, तर इतर राज्यांप्रमाणेच गोव्यातही त्यांचा पूर्णपणे सफाया होऊ शकतो. सर्वात दुर्दैवी बाब ही आहे की, गोव्यातील राजकारणी भूतकाळातील अपयशातून धडा शिकायला तयार नाहीत. आजही गोव्यात विरोधी पक्ष मजबूत दिसून येत नाही.
पश्चिम बंगाल आणि आसाममधील भाजपची कामगिरी ही केवळ एक तात्पुरती लाट नसून, संपूर्ण भारतात निवडणुका कशा नव्याने आकार घेत आहेत याचेच ते अधिक द्योतक आहे. गोव्यासाठी संदेश स्पष्ट आहे की, विरोधी पक्षांनी एक भक्कम संघटनात्मक जाळे, कथानकातील स्पष्टता आणि स्थानिक संवेदनशील मुद्यावर पूर्ण भर देण्याची गरज आहे. विरोधक एकत्रितपणे 2027 मध्ये निवडणुकीला सामोरे गेले तरच गोव्यात निर्णायक बदल होऊ शकतो.
आजच्या घडीला गोव्यात विरोधक एकत्र नाही. मात्र, त्यांच्याकडे एकत्र येण्यासाठी अजून थोडा वेळ हातात आहे. आपसातील मतभेद व रूसवे फुगवे बाजूला ठेऊन एकत्र आले तरच भाजपला रोखता येईल, अन्यथा गोव्यातील निकाल हा भाजपच्याच बाजूने असेल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज भासणार नाही. योगी सर्वांविषयी सारखेपणा बाळगत असल्यामुळे तो सर्वांशी समबुद्धीने वागतो