काळ्या बिबट्याचे सौंदर्य
भारतीय जंगल नानाविध पशु-पक्षी यांच्या अस्तित्वाने पूर्वापार समृद्ध असून, मार्जार कुळातील वाघ, बिबटे हे प्राणी इथल्या जंगलाची शान ठरलेले आहे. भारतात आशियाई हत्ती आणि राजेशाही पट्टेरी वाघ आढळत असल्याने, या जंगलाचे वैभव लक्षवेधी ठरले आहे. मार्जार कुळातील वाघाबरोबर बिबटेही इथल्या जंगलात पाहायला मिळतात.
मार्जार कुळातील या प्राण्यांची संख्या वाघांच्या तुलनेत खूपच ज्यादा असली तरी आकाराने तो लहान असून, त्याच्या अंगावरती जे लक्षवेधक ठिबके असतात, ते पोकळ असतात तर चित्त्याच्या अंगी भरीव ठिबके पाहायला मिळतात. आज भारतातील चित्ते नामशेष झाल्याने भारत सरकारने आफ्रिकेतील नामिबिया देशातील चित्ते मध्यप्रदेशातल्या ‘कुनो’त आणलेले आहेत. चित्ते ताकद आणि वेग या दृष्टिकोनातून बिबट्यापेक्षा सरस आहेत. आज बिबट्यांची संख्या आपल्या देशात खूप मोठी असल्याचे मानले जात असले तरी त्यांचा नैसर्गिक अधिवास संकटग्रस्त झालेला आहे आणि मानव बिबटे यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे.
बिबट्याचे खाद्यान्न वैविध्यपूर्ण असून, त्यात खूर असणाऱ्या प्राण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु असे असले तरी वाघांच्या तुलनेत त्याचा आकार लहान असल्याने शिकार करताना त्याला पदोपदी संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे बिबट्या जास्त प्रमाणात लोकवस्तीच्या आसपास राहण्याला विशेष प्राधान्य देतो आणि तेथील भटके कुत्रे, पाळीव गुरे-ढोरे यांच्यावर हल्ले करून फडशा पाडतो. त्यामुळे बिबट्याचा परिसरातील मानवी समाजाशी संघर्ष वाढलेला आहे. बिबट्यात पूर्णपणे काळे ठिबके असणारा प्राणी, काळा वाघ म्हणून ओळखला जातो. काही काहीवेळा बिबट्याची मादी जेव्हा पिल्लांना जन्म देते, त्यावेळी जन्माला आलेल्या ज्या पिल्लात मेलनिन रंगद्रव्य जास्त असते, त्याच्या अंगावर काळे ठिबके विकसित झाल्यावर त्याचे काळेपण आणखीनच खुलून दिसते आणि असा बिबट्या, काळा वाघ म्हणून ओळखला जातो. कातडीचा रंग ‘मेलनिन’ या रंगद्रव्यावर अवलंबून असतो, त्याचे प्रमाण अधिक असल्यावर हा बिबळ्dया काळा किंवा गडद रंगाचा पहायला मिळतो. बिबळ्dया हा मार्जार कुळातील ‘पँथेरा पारडस’ असून त्याच्या काळ्या रंगाच्या ठिबक्यांमुळे तो जरी वेगळा दिसत असला तरी त्याच्या एकंदर वागण्यात काही भिन्न फरक दृष्टीस पडत नसतो.
सर्वसाधारण बिबळ्यासारखे त्याचे वर्तन असते परंतु असे असले तरी या बिबळ्याविषयी वन्यजीव अभ्यासक आणि संशोधकांना त्यांचे विशेष आकर्षण होते. ‘ऊडयार्ड किपलिंग’ यांच्या जंगल बुकमध्ये ‘बगिरा’ या काळ्या वाघाचे नाव अजरामर झालेले आहे. इंग्रजी साहित्यात वन्यजीव संशोधकांनी दक्षिण भारतीय जंगलात पाहायला मिळालेल्या काळ्या वाघाची सुंदररित्या वर्णने केली होती आणि त्यामुळे ताकद, वर्तन, चपळता या दृष्टीने भिन्न नसताना हा काळा बिबट्या वेगळा समजला गेला.
26 एप्रिलच्या पहाटे गोव्यातील फोंडा तालुक्यातील कोने-प्रियोळ येथील रस्ता ओलांडताना ही काळा बिबट्या मादी अनोळखी वाहनाची धडक बसून जखमी झाली परंतु वन खात्याकडे पशु वैद्यकीय सेवा देण्यासाठी यंत्रणा आणि ताबडतोब उपाय करणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या मादीचा कऊण मृत्यू झाला. यापूर्वी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या सत्तरी, काणकोण, धारबांदोडा, सांगे येथे काळ्या वाघाचे दर्शन झाल्याने, मादीचा मृत्यू प्रियोळसारख्या शहरी भागाशी संलग्न परिसरात गजबजलेल्या रस्त्यावर झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. तृणहारी प्राण्यांची, मांस, कातडी, शिंगे यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याने, आज जंगलात बिबट्यासारख्या प्राण्याला अन्न मिळणे कठीण झालेले आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने बहुधा ही मादी लोकवस्तीच्या आसपास आली आणि पाळीव प्राण्यांची शिकार करता-करता रस्ता ओलांडताना मृत्युमुखी पडली असावी.
वर्षाला सरासरी देशभरात दोनशेच्यावर बिबट्याचे मृत्यू उद्भवत असून, पट्टेरी वाघासारखे वन्यजीव कायदा 1972 द्वारे बिबट्यांना संरक्षण दिलेले असताना, त्यांची हत्या मोठ्या प्रमाणात केली जात आहे. भटके कुत्रे, पाळीव जनावरे सहजरित्या लोकवस्तीच्या आसपास आढळत असल्याने बिबळ्यांनी अशा परिसरात वावर, वास्तव्य करण्यास प्राधान्य दिलेले आहे आणि त्यामुळे त्यांचे मृत्यू वाढत चालले आहे. एकेकाळी जो माणूस वन्यजीवांच्या सहवासात राहायचा त्याला आजच्या घडीला बिबट्यांसारखे प्राणी आपले शत्रू भासू लागले आहेत.
2023 साली देशभरात 544 बिबट्याचे मृत्यू उद्भवलेले असून, त्यात कातडी, दात आदी अवयवांसाठी केली जाणारी शिकार, तस्करी त्याचप्रमाणे लोकांच्या आग्रहाखातर पिंजऱ्यात जेरबंद करण्यामुळे हे मृत्यू उद्भवलेले आहेत. गेल्या दशकभरात बिबळ्याच्या मृत्यूची प्रकरणे वाढली असून एखादा बिबळ्या सहजपणे दृष्टीस पडला तरी स्थानिक लोक त्याला पिंजऱ्यात जेरबंद करून शेकडो मैल दूर सोडण्याची मागणी करतात. परंतु अशा स्थलांतरित करण्याच्या आततायी प्रकरणामुळे बिबळ्या आक्रमक होऊन प्राणघातक हल्ले करण्यास प्रवृत होत असल्याचे दिसून आले आहे.
राजस्थान, उत्तराखंड येथील बिबळ्याने जे हल्ले करून लोकांचे जीव घेतले, त्या बहुतांश बिबळ्याचे जगणे संकटग्रस्त असल्याचे स्पष्ट झालेले आहे. गोव्यासारख्या राज्यात आज सिमेंट काँक्रीटच्या बांधकामांना इतक्या प्रमाणात चालना दिली जात आहे की, त्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडून बिबळ्यासारख्या प्राण्यांना लोकवस्ती, बागायती परिसरात वावर करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे काळा बिबट्याची मादी मृत्यूमुळे हळहळलेली सामाजिक संवेदना सर्वसामान्य बिबळ्याच्याप्रति निर्माण होण्याची गरज आहे.
काळा बिबट्याचे परिसरात दिसणे, ही बाब दुरापास्त मानलेली असली तरी गोव्यात चक्क गजबजलेल्या रस्त्यावर मादी काळ्या बिबळ्याचा मृत्यू उद्भवल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास, अन्न, पाण्याचे स्रोत कसे संकटग्रस्त होत चालले, हे स्पष्ट होत आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ आदी पर्यावरणीय बदलांबरोबर मानवी समाजकेंद्रित विकासाचे वाढत चाललेले प्रकल्प, यामुळे ही परिस्थिती बिघडली आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
- राजेंद्र पां केरकर