हिंदूंच्या एकतेचा आंबोली पॅटर्न महाराष्ट्रभर पोहोचविणार
आ. महेश लांडगे यांचे आंबोलीत प्रतिपादन
आंबोली : प्रतिनिधी
आंबोली ,चौकुळ , गेळे या तीन गावांनी जमिनी परप्रांतियांना विकणार नाही असा घेतलेला निर्णय खरोखरच हिंदुत्वाच्या हिताचा आहे. हा आदर्श मी संपूर्ण महाराष्ट्रभर सांगेन असे मत पुणे - भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले , हिंदूंमध्ये एकता नसल्यामुळेच जिहादी मानसिकतेच्या लोकांचे धैर्य वाढते. हिंदूंनी आता संघटित होणे ही काळाची गरज आहे. जर धर्म सुरक्षित राहिला, तरच आपण, आपली मुले आणि पुढची पिढी सुरक्षित राहील,” असे परखड प्रतिपादन भोसरी (पुणे) विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी येथे केले.आंबोली, चौकुळ आणि गेळे या तीन गावांतील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य ‘हिंदू संमेलनात’ ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. आंबोली येथील श्री माऊली मंदिरात हे संमेलन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाची सुरुवात श्री राम मंदिर ते माऊली मंदिर अशा भव्य शोभायात्रेने झाली. या यात्रेत ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामांचा रथ, भगवे ध्वज आणि पारंपारिक वेषातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माऊली मंदिर परिसरात दीपप्रज्वलन करून आणि महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली.श्री. लांडगे यांनी आपल्या भाषणात आंबोली, चौकुळ आणि गेळे या तीन गावांनी परप्रांतियांना जमिनी न देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “तुमच्या या निर्णयाचा आदर्श मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेन. आपली मालमत्ता अशा लोकांना विकू नका, जे नंतर तुमचे जगणे कठीण करतील. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि अमली पदार्थांच्या विळख्यातून हिंदू कुटुंबांना वाचवण्यासाठी हिंदूंनी व्यवसायातही आपल्याच धर्मातील लोकांना प्राधान्य दिले पाहिजे.” तसेच, सर्वधर्मसमभाव आणि पारंपरिक राजकारण्यांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.संस्कृती आणि स्वभाषेचा अभिमान बाळगा विश्व हिंदू परिषदेचे डॉ. पंकज दिघे यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, कुटुंब व्यवस्था, सामाजिक समरसता आणि पर्यावरण रक्षण ही आपली पंचसूत्री असली पाहिजे. सोशल मीडियाच्या आहारी न जाता मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. तसेच, परकीय भाषेपेक्षा स्वभाषेतून व्यवहार करून आपली संस्कृती जपण्याचे आवाहन त्यांनी केले.आळंदी येथील कीर्तनकार सायलीताई महाराज गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून धर्माची वाटचाल करण्याचे आवाहन केले. “शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले, त्यांनी धर्मासाठी कधीही तडजोड केली नाही, हाच विचार आपण पुढे नेला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.या संमेलनाला तिन्ही गावांतील हिंदू समितीचे कार्यकर्ते, मानकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.