For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘जिंकण्याची क्षमता’ हाच असेल उमेदवारीचा निकष!

07:50 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘जिंकण्याची क्षमता’ हाच असेल उमेदवारीचा निकष
Advertisement

‘27 मध्ये 27’ सह सत्तास्थानी येणे हे उद्दिष्ट : संपादकांशी वार्तालाप कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

येत्या 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत 27 जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी केवळ ‘जिंकण्याची क्षमता’ या एकमेव निकषावरच उमेदवारी देण्यात येईल. त्यामुळे विद्यमान मंत्री वा आमदार यापैकी कुणीही आपणाला उमेदवारी मिळेलच या भ्रमात राहू नये. तसे झाल्यास तो त्यांचा गैरसमज असेल, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

निवडणुकीस जेमतेम 17 महिने शिल्लक राहिले असून भाजप पूर्ण जोमाने तयारीला लागली आहे. पक्षातर्फे सर्व मतदारसंघात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर उमेदवार निवडीवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यात केंद्रातील पक्षश्रेष्ठींचाही सल्ला घेण्यात येणार असून 27 चे संख्याबळ गाठून सत्ता प्राप्त करणे हे उद्दीष्ट आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री वा आमदार यामधील प्रत्येकालाच उमेदवारी मिळेल याची हमी देता येणार नाही. केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच संधी मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतर राज्यात फेररचना : मुख्यमंत्री

शुक्रवारी सायंकाळी पणजीत आयोजित संपादकांशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचीही उपस्थिती होती. राज्यात विद्यमान सरकार स्थापन होऊन बराच मोठा कालावधी उलटला तरीही मंत्रिमंडळ फेररचना का होत नाही, किंवा ती सतत लांबणीवर का पडत आहे?, असे विचारले असता, फेररचना नक्कीच होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सध्या सर्वजण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्याशिवाय नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश भीतीच्या छायेखाली असल्याने फेररचना तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्री आलेक्स सिक्वेरा हे सध्या गंभीर आजारी आहेत. त्यांना नक्की कोणता आजार झालेला आहे त्यासंबंधी फारशी कल्पना नाही. मात्र आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले.

...तर राजधानीची स्थिती बकाल झाली असती

राजधानीत स्मार्ट सिटी अंतर्गत चाललेल्या कामांच्या दर्जाबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. ही कामे दर्जाहीन झाल्याचा आरोप करत लोक त्याबद्दल संशय व्यक्त करत आहेत, असे काही संपादकांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. त्यावर बोलताना, स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील कामे झाली नसती तर यंदा राजधानीची स्थिती बकाल झाली असती, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

त्रुटी दुऊस्तीची जबाबदारी कंत्राटदारांची

स्वभावधर्मानुसार लोक बोलतातच. काम केले तरी बोलतात आणि नाही केले तरीही बोलतात. परंतु ही कामे होणे अत्यावश्यक होते. मात्र जी कामे पूर्ण झाली आहेत, ती काही आंधळेपणाने मंजूर करण्यात येणार नाहीत. त्यांचे लेखापरीक्षणही होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक कामाची पाच वर्षांची हमी घेण्यात आली असून त्या दरम्यान काहीही झाल्यास कंत्राटदारास जबाबदार धरून त्याच्याकडून स्वखर्चाने ते दुऊस्त करून घेण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीची कामे तीन ते चार कंत्राटदार कंपन्यांकडून सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कला अकादमीप्रश्नी मौन नव्हे, भाष्य केले नव्हते

कला अकादमीच्या कामात सापडलेल्या काही त्रुटींच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. ही कामे हमी कालावधीत आहेत. अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत. तसेच पूर्ण झालेल्या कामांचे संपूर्ण पैसेही अद्याप फेडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ती दुऊस्त करण्याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची आहे. त्यानंतरच त्यांची बिले मंजूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तरीही या प्रश्नी आपण मौन बाळगल्याचे जे आरोप होत आहेत, त्यात तथ्य नाही. नको त्या वेळी नको ते प्रश्न विचारण्यात आल्यामुळे आपण त्यावर भाष्य केले नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

52 टक्के मतांसह 27 चे उद्दीष्ट : दामू

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी, 2027 च्या निवडणुकीत दोन-चार मतदारसंघ वगळले तरीही भाजप 52 टक्क्यांपर्यंत मते मिळवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. तशीही यापूर्वी आम्ही 51 टक्केपर्यंत मते मिळविलेली आहेत. त्यामुळे यंदा केवळ एक टक्का वाढीव मतांचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि प्रयत्न आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपची साथ दिलेल्या मतदारांना विधानसभा निवडणुकीतही पक्षासोबत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून  आगामी जिल्हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्तीसाठी आम्ही राज्यभर दौरे प्रारंभ केले आहेत. त्याद्वारे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीतून सतत संपर्कात राहण्याचे प्रयत्न आहेत. आम्ही दोन-चार मतदारसंघ वगळण्याबद्दल बोललो असलो तरीही प्रत्यक्षात चाळीसही मतदारसंघांत लढण्याचा हेतू आहे. पक्षाला पुन्हा सत्तास्थानी आणणे हे ध्येय असल्याने प्रत्येक मतदारसंघ बळकट करण्यावर भर दिला आहे, असे नाईक यांनी पुढे सांगितले.

Advertisement
Tags :

.