भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश एकमेकांना धोका समजतात. अमेरिका या दोन्ही देशांपैकी कोणालाही अमेरिकेसाठी धोका मानत नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेटे हॅसथॅग यांनी शांग्री ला संवाद या कार्यक्रमात केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सशस्त्र संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रंप यांनी मध्यस्थी करुन थांबविला, या दाव्याचा त्यांनी या कार्यक्रमात पुनरुच्चार केला. भारत आणि पाकिस्तान आंतरखंडीय क्षेपणास्त्रे बनविण्याच्या मार्गात आहेत. त्यांच्यात संबंध तणावाचे असतात. दोन्ही देशांना एकमेकांसंबंधी अविश्वास आहे, या बाबी स्पष्ट आहेत. दोन्ही देश संरक्षणसिद्धता करीत आहेत. तसेच शस्त्रबळ वाढवित आहेत. तथापि, त्यांच्यापैकी कोणीही अमेरिकेसाठी धोका असल्याची आमची भावना नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यापैकी कोणत्याही देशाकडे बोट दाखविणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी या कार्यक्रमात भारत-प्रशांतीय क्षेत्रातील स्थितीविषयीही वक्तव्य केले. या क्षेत्रावर कोणाचाही एकाधिकार असू नये, असे अमेरिकेचे आणि या क्षेत्रातील इतर अनेक देशांचे म्हणणे आहे. क्वाड ही संघटना या क्षेत्रात समतोल राखण्यासाठी आणि सागरी वाहतूक सुरक्षित राखण्यासाटी स्थापन करण्यात आली आहे. अमेरिकेचे अनेक मित्रदेश या क्षेत्रामध्ये आहेत. अमेरिकेचे धोरण समतोल आणि मुक्तता राखण्याचे आहे, असेही प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.