पाजीफोंड हिंदू स्मशानभूमीत कचरा टाकल्याने तणाव
पंच राज्याध्यक्षसह फोंडेकर यांना मारहाण : हल्लेखोरांकडून ‘चुन चुन के मारेंगे’ची धमकी’
मडगाव : पाजीफोंड-मडगाव येथील हिंदू स्मशानाजवळ कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारणारे पंच सदस्य साईश राज्याध्यक्ष आणि मठग्रामस्थ हिंदू सभेचे ट्रस्टी जयवंत फोंडेकर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार काल रविवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी 7 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अफजल शेख, जाफर खान, मंजुनाथ हरिजन, शाबुद्दिन काडोल, नासिर शेखर, निजाम बसू, जाफर बसू अशी हल्ला करण्यात गुंतलेल्या संशयितांची नावे आहेत. मारहाणीचा प्रकार समजताच मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नाईक व शर्मद पै रायतूरकर यांनी कार्यकर्त्यांसह पोलिसांत धाव घेत दोषींवर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भाई नायक म्हणाले की, स्मशानभूमीजवळ गेल्या कित्येक दिवसांपासून कचरा टाकण्याचे प्रकार घडत होते. काल रविवारी दवर्लीचे पंच सदस्य साईश राज्याध्यक्ष यांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले. त्यावेळी त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, साईश यांनी त्याला रोखून धरले. यावेळी त्या व्यक्तीने इतरांना बोलावून घेतले व साईश राज्याध्यक्ष आणि जयवंत फोंडेकर यांना मारहाण केली. या मारहाणीत गुंतलेल्या सर्वांवर फातोर्डा पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी भाई नायक यांनी केली.
चुन चुन के मारेंगे...
साईश राज्याध्यक्ष म्हणाले की, मारहाण करण्यात गुंतलेल्या व्यक्तींनी आम्हाला ‘चुन चुन के मारेंगे’ अशी धमकी दिली. मारहाण करण्यासाठी दहा-बारा जणांचा जमाव एकत्र आला होता. त्यांच्या हातात दंडुके, चॉपर व लोखंडी सळ्या होत्या. त्यांनी आपल्याला मारहाण करून अंगावरील सोन्याची साखळी तसेच खिश्यातील पैसे काढून घेतले आहेत. आपल्या मदतीला आलेल्या जयवंत फोंडेकर यांनादेखील त्यांनी जबर मारहाण केल्याचे साईश राज्याध्यक्ष म्हणाले. फातोर्डा पोलिसांनी या मारहाण प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तसेच राज्यसभा खा. सदानंद शेट तानावडे यांनी देखील असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितल्याचे साईश राज्याध्यक्ष म्हणाले. शर्मद पै रायतूयकर यांनीही या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला. गोवा शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो अशा वेळी गुंडागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. पोलिसांनी मारहाण प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना त्वरित अटक करावी अशी मागणी केली.