एलएसीवर तणाव, अन् व्यापारी तूट अमान्य
जयशंकर यांनी चीनच्या विदेश मंत्र्यांना सुनावले
मनीला : आसियान देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी फिलिपाईन्स येथे पोहोचलेले भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे विदेशमंत्री वांग यी यांची भेट घेतली आहे. त्यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले, तर वाढत्या व्यापार तुटीच्या मुद्द्यावरून सुनावले आहे. चिनी बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना निष्पक्षपणे प्रवेश अन् पुरवठासाखळीच्या स्थिरतेचा मुद्दा जयशंकर यांनी उपस्थित केला. तसेच दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान संपर्क वाढविण्यावर जोर दिला आहे. संबंध सामान्य करण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसीवर शांतता अन् स्थिरता महत्त्वाची अट असल्याचे जयशंकर यांनी वांग यी यांच्यासमक्ष स्पष्ट केले आहे.
ऑक्टोबर 2024 पासून दोन्ही देश महत्त्वपूर्ण लक्ष्यांना सुनिश्चित करण्यासाठी सहमत झाले होते. याप्रकरणी आम्हाला निरंतर पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारत आणि चीन विशाल तसेच महत्त्वपूर्ण देश आहेत आणि शेजारी आहेत. दोन्ही देशांचे स्वत:चे हितसंबंध आहेत. याचमुळे मतभेदांना वादाचे स्वरुप होऊन देण्यावर दोन्ही देशांचे नेते सहमत झाले आहेत. या सहमतीला योग्यप्रकारे हाताळणे ही कूटनीतिची जबाबदारी असल्याचे जयशंकर यांनी चर्चेदरम्यान म्हटले आहे.
वांग यी यांना चीनचे ‘चाणक्य“ म्हटले जाते आणि ते दीर्घकाळापासून सीमा वादाच्या मुद्द्यावर चीनच्या वतीने चर्चेत सामील होत राहिले आहेत.
चीनसोबतची व्यापारी तूट
भारत आणि चीनदरम्यान व्यापारी तूट 112.16 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. हा आकडा दरवर्षी सातत्याने अत्यंत वेगाने वाढत चालला आहे. चीन अनेकदा भारताला होणारी दुर्लभ धातूंची निर्यात रोखत असतो. तसेच संवेदनशील तंत्रज्ञान अन् यंत्रसामग्री देण्यास टाळाटाळ करत असतो. याचमुळे जयशंकर यांनी चीनच्या विदेश मंत्र्यांच्या समक्ष हा मुद्दा उपस्थित केला आहे.