उदयपूरमध्ये पुन्हा तणाव वाढला
सावधगिरीसाठी वाढवला पोलीस बंदोबस्त : बाजारपेठेवरही परिणाम
वृत्तसंस्था/ उदयपूर
उदयपूरमधील तणाव नियंत्रणात आला असतानाच रविवारी सकाळी पुन्हा एकदा शहरात मोठा गोंधळ झाला. शहरातील मुखर्जी चौकात दोन समाजातील जमाव आमनेसामने आल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही बाजूंमध्ये वादावादी सुरू झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तेथे पोहोचला. पोलीस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांती दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांचा नि:श्वास सोडला. दिवसभर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची आई रविवारी सकाळी त्याला भेटण्यासाठी एमबी हॉस्पिटलमध्ये गेली होती. मात्र तेथे त्यांना त्यांच्या मुलाला भेटू दिले नाही आणि त्यांना घरी परत पाठवण्यात आले. यामुळे तिला राग आला आणि ती घरी आली. नंतर मुखर्जी चौकात जात तिने आंदोलन छेडले. यावेळी अन्य काही महिलाही तिच्यासोबत हजर झाल्याने घटनास्थळी महिलांची संख्या वाढत गेली. यावेळी जमलेल्या लोकांनी मुखर्जी चौकातील दुकाने बंद करण्यास भाग पाडली. या मार्केटमधील बहुतांश दुकाने दुसऱ्या समाजवासियांची आहेत. दुकाने बंद करताना तेही संतप्त झाले. पुढे त्या लोकांची गर्दीही तिथे जमू लागली. काही वेळातच दोन्ही गट समोरासमोर आले. दोन्ही पक्षात वादावादी झाल्याने तणावाचे वातावरण पसरले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन तेथे धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना शांत केले. शांततेचे वातावरण पुन्हा बिघडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.