दहा हजार बालके तीन वर्षांत बेपत्ता
बालिकांचे प्रमाण अधिक : राज्यातील स्थिती
बेंगळूर : राज्यात मागील तीन वर्षांत दहा हजार बालके बेपत्ता असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे. या बालकांचे अपहरण किंवा बेपत्ता झाल्याने त्यांचा पालकांपासूनच संपर्क तुटला आहे. बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांच्या पालकानी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी शोधकार्य हाती घेऊनही हजाराहून अधिक मुलांचा थांगपत्ता लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या बालिकांची संख्या 7 हजारापर्यंत असून यापैकी 6 हजार बालिकांच्या शोध लागला आहे. उर्वरित एक हजार बालिकांचा शोध घेण्याचे कार्य सुरूच आहे. बेंगळूरमधून अधिक प्रमाणात बालके बेपत्ता झाली आहेत. यामध्ये काही बालकांचे अपहरण झाले आहे. त्यानंतर, चित्रदुर्ग, दावणगेरी, मंड्या, तुमकूर या जिह्यांचा क्रमांक लागतो.
बेपत्ता होण्याची कारणे
पालकांकडून दुर्लक्षित, मुलांवर वारंवार खेकसणे, रागाने बोलणे, शिविगाळ करणे यासारख्या प्रकारामुळे मुले घर सोडून जात असतात. शिक्षण घेण्याची इच्छा नसणे, शिक्षकांच्या भीतीमुळेही मुले बेपत्ता होत असतात. मुलांना भिक्षा मागण्यास पाठविणे, बालकामगार पद्धती, अनैतिक प्रकारांसाठी मुलांचे अपहरण, मानवाची तस्करी, समाजमाध्यमांचा प्रभाव, प्रेमप्रकरणे यासारख्या प्रकारातून मुले पालकांपासून दूर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.