तुष्टीकरणामुळे मंदिराचा लढा लांबला : सरसंघचालक
धर्माच्या नावावर भारतात झाले आक्रमण : प्रतिकूल काळातही भगवान रामावरील श्रद्धा कायम
वृत्तसंस्था/ नागपूर
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराची कायदेशीर लढाई तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे लांबला होता अशी भ्टूमिका मांडली आहे. आता राम मंदिरावरून वाद आणि कटूता पूर्णपणे संपविण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे. भागवत यांचा मराठी भाषेतील एक लेख रविवारी प्रकाशित झाला आहे. यात त्यांनी मागील 1500 वर्षांमध्ये भारतावर झालेल्या अनेक आक्रमणांबद्दल भूमिका मांडली आहे. धर्माच्या नावावर झालेल्या आक्रमणामुळे समाजात विभागणी वाढल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या लेखात त्यांनी मंदिरासाठी चाललेल्या प्रदीर्घ संघर्षाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख केला. तसेच भगवान रामाचे गुण स्वत:च्या जीवनात अंगिकारण्याचे आवाहनही केले.
1500 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आक्रमणांचा उल्लेख लूट करणे होता. यानंतर धर्माच्या नावावर भारतावर आक्रमणे झाली, यामुळे आमच्या देशात आणि समाजात दुही वाढली. धार्मिक स्थळांना नष्ट करण्यात आले, असे एकदा नव्हे तर वारंवार करण्यात आले. तरीही भारतात भगवान रामासाठीची श्रद्धा, निष्ठा आणि मनोबळ कधीच कमी झ्ा़ाले नाही. राम जन्मभूमीचा मुद्दा लोकांच्या मनात कायम राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
इंग्रजांनी पाडली फूट
इंग्रजांच्या ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणानंतरही राम जन्मभूमीचा मुद्दा लोकांनी सोडला नाही. आमची एकता तोडण्यासाठी इंग्रजांनी संघर्षाच्या नायकांना अयोध्येत फाशी दिली. यामुळे राम जन्मभूमीचा प्रश्न प्रलंबित पडला, परंतु संघर्ष कायम राहिला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली, भेदभाव-तुष्टीकरणामुळे त्या काळातील सरकारांनी हिंदूंच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. यामुळे कायदेशीर लढाई देखील लांबली. अखेर जन आंदोलन सुरू झाले, जे तीस वर्षापर्यंत चालल्याचे भागवत यांनी लेखात म्हटले आहे.
संतुलित निर्णय
1949 मध्ये रामजन्मभूमीवर भगवान रामाची मूर्ती प्रकट झाली. 1986 मध्ये न्यायालयाच्या आदेशाद्वारे मंदिराचे टाळे उघडण्यात आले. यानंतर अनेक अभियान आणि कारसेवेच्या माध्यमातून हिंदू समुदायाचा संघर्ष सुरूच राहिला. 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आला, यानंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी 134 वर्षांच्या कायदेशीर संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने संतुलित निणंय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात दोन्ही बाजूंच्या भावना आणि तथ्यांवर विचार करण्यात आला होता. या निर्णयानुसार मंदिराच्या उभारणीसाठी एक ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट 2020 रोजी झाले आणि आता 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे भागवत यांनी नमूद केले.
‘जेथे युद्ध होऊ नये’
अयोध्येचा अर्थ जेथे युद्ध होऊ नये म्हणजेच संघर्षापासून मुक्त स्थान असा आहे. अयोध्येची पुनर्मिर्मिती काळाची गरज असून आम्हा सर्वांचे कर्तव्य देखील आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीची संधी राष्ट्रीय गौरवाच्या पुनर्जागरणाचे प्रतीक आहे. आम्हाला श्रीरामांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालावे लागणार ओ. जीवनात सत्यनिष्ठा, बळ आणि पराक्रमासोबत क्षमता, विनयशीलता आणि नम्रता अंगिकारावी लागणार असल्याचे भागवत म्हणाले.
राम मंदिरासोबत पूर्ण विश्वाची पुनर्निर्मिती
राम-लक्ष्मणाने स्वयंशिस्तीच्या बळावर 14 वर्षांचा वनवास पूर्ण केला होता. आम्हाला सामाजिक जीवनात देखील शिस्तप्रिय व्हावे लागेल. आम्ही सर्वांनी 22 जानेवारीच्या भक्तिमय उत्सवात मंदिराच्या पुनर्निर्मितीसोबत पूर्ण विश्वाच्या पुनर्निर्मितीचा संकल्प घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.