मालवण - कसाल मार्गावरची झाडे बनतायत मृत्यूचा सापळा
अधिकाऱ्यांना नाही सोयरसुतक ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
चौके/वार्ताहर
मालवण - कसाल या रस्त्यावरती कट्टा गुरामवाड ते चौके पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली मोठ मोठी झाडे मृत्यृचा सापळा बनत आहेत या रस्त्याचा पुर्व इतिहास बघितला असता यापुर्वी बर्याच वेळा या रस्ताच्या बाजूला असणारी झाडे मोटारचालकांच्या अंगावरती पडून बरेच जण मृत्युमुखी पडलेले आहेत.ही कोरम झालेली झाडे वाहनावरती पडून बरेच नुकसान झाले आहे. याआधी चार ते पाच मोटरचालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.काही वर्षापुर्वी एक झाड एस.टी.वरती पडून मोठा अपघात झालेला होता.काही झाडे ही रस्त्याला लागून असल्यामुळे वाहने त्या झाडाना जाऊन धडकतात.त्यामुळे मृत्युला आमंत्रण देणारी ही झाडे तोडून टाकावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे.या बाबत वाहन चालक -मालकांकडून तसेच एस.टीचे चालक, खाजगी वाहन चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बाधकांम विभागाचे अधिकारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहे का?असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
या बाबत असे समजते की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील धोकेदायक झाडे तोडण्याची निविदा काढून एका ठेकेदाराला झाडे तोडण्याचा ठेका दिलेला होता.मात्र या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी वर्गाला मॅनेज करून जी उपयोगी झाडे आहेत ती झाडे तोडून नेली व जी झाडे उपयोगी नाहीत ती झाडे तोडलेली नाहीत.आणि आत्ता ही झाडे धोकेदायक बनली आहेत.हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने घडत आहे का असा सवाल नागरिक विचारत आहेत . .जर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना एखादे झाड पडून अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाला धरले जाईल.मालवण कसाल या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी वरिष्ठ अधिकारी वर्ग,मंत्री,आमदार,खाजदार नेहमी प्रवास करीत असताना त्यांना हि धोकेदायक झाडे दिसून येत नाहीत का? अशा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.